महापालिका निवडणुकीसाठी १५ डिसेंबरला मतदान होणार असून
३५ प्रभागातील ७० जागांसाठी ३३८ मतदान केंद्रांची सोय करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य सचिव सुनील पोरवाल यांनी दिली.
येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी निवडणूक निरीक्षक विलास पाटील, जिल्हाधिकारी प्रकाश महाजन, महापालिका आयुक्त दौलतखाँ पठाण, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे आदी उपस्थित होते. निवडणुकीसाठी प्रशासनातर्फे तयारी पूर्ण करण्यात आली असून यासाठी ४०० पथके तयार करण्यात आली आहेत. या वेळी मतदान यंत्रावर नापसंतीचेही बटण राहणार असल्याने एकही उमेदवार पसंत नसल्यास मतदारांनी नापसंतीचे बटण दाबण्याचे आवाहनही पोरवाल यांनी केले.  शहरात दोन लाख ६९ हजार मतदार आहेत. मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर प्रभागातील ८०० मतदारांना मतदान करता येणार आहे. या केंद्रापैकी ज्या प्रभागातील लढती अटीतटीच्या आणि वादाच्या ठरू शकतात, अशा प्रभागातील काही केंद्र हे संवेदनशील म्हणून जाहीर करून त्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. त्यात सर्वाधिक मतदान केंद्रांची संख्या प्रभाग क्रमांक ३४ मध्ये आहे.