शेतजमीन खरेदी करण्याच्या वादातून झालेल्या बेदम मारहाणीत एका शेतक ऱ्याचा मृत्यू झाला. माळशिरस तालुक्यातील खुडूस येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी माळशिरस पोलिसांनी चौघा जणांना अटक केली आहे.
अर्जुन निकम असे खून झालेल्या शेतक ऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी मारूती निकम, सुनील निकम, धनाजी निकम, नवनाथ कापसे, शंकर मगर, अनिल कदम, समाधान कापसे यांच्याविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापैकी चौघा जणांना अटक झाली आहे. या घटनेची पाश्र्वभूमी अशी की, गावातील राजेंद्र जमदाडे याने दत्तू निकम याच्या मालकीची दोन एकर शेतजमीन खरेदी करण्याचे ठरविले होते. परंतु या व्यवहारास मारूती निकम व धनाजी निकम यांचा विरोध होता. याच कारणावरून त्यांनी राजेंद्र जमदाडे यांना शिवीगाळ व दमदाटी केली होती. रात्री राजेंद्र जमदाडे हे दत्तू निकम व मृत अर्जुन निकम यांच्यासोबत लक्ष्मण निकम यांच्या घरात गप्पा मारत बसले असताना अचानकपणे मारूती निकम व त्याच्या साथीदारांनी त्याठिकाणी घुसखोरी करून मारहाण सुरू केली. यात भांडण सोडविण्याचा प्रयत्न करणारा अर्जुन निकम हल्ल्यात हा गंभीर जखमी होऊन मरण पावला. अन्य दोघे जखमी झाले.