हवामान बदलाचे राक्षसी परिणाम आता जगभर दिसू लागले आहेत. भविष्यात हे परिणाम आणखी भीषण होणार असून किनारपट्टीवरील शहरांना या धोक्याची तीव्रता अधिक असल्याने, आपल्या मुंबईचे भविष्यही डळमळीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आणखी बरोबर ५६ वर्षांनी, २०७० सालानंतर, जगातील किनारपट्टीवरील सुमारे २० शहरे पाण्याखाली जातील, असे भेदक भविष्य ‘ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट’ या जागतिक संस्थेने वर्तविले असून हा मुंबईचा परिसर या संकटाच्या सर्वाधिक जवळ असल्याचा निष्कर्ष या संस्थेने काढला आहे. तापमान बदलामुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी या संस्थेने जगातील बंदरांच्या ठिकाणी असलेल्या १३६ मोठय़ा शहरांची निवड केली. वादळे आणि वेगवान वाऱ्यांच्या प्रभावामुळे किनारी भागातील जलप्रलयांचाही या संस्थेने अभ्यास केला. आणि आशिया खंडातील सर्वाधिक बंदरांना हवामानबदलाच्या संकटाचा धोका असल्याचा निष्कर्ष निघाला. इंडोनेशियातील जकार्ता शहर २० व्या क्रमांकावर आहे, तर आपली मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या काही वर्षांत प्रदूषणामुळे झालेले हवामान बदलाचे परिणाम इतके वाढले आहेत, की २०१२ मध्ये जुलै महिन्यात झालेल्या पावसात वादळी वाऱ्यांसोबत पिवळी भुकटी मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागांत आढळली. तापमान वाढल्यावर हवेचा दाब कमी होतो आणि वाऱ्यांचा वेग वाढतो. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर ढग जमा होऊन अतिवृष्टी होते. मुंबईत काही वर्षांपूर्वी २६ जुलैला झालेल्या ढगफुटीचे कारणही हेच होते. तेव्हा एकाच दिवसात मुंबई जलमय झाली होती. जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक जीव मृत्युमुखी पडले. अशीच स्थिती यापुढेही वारंवार उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आणखी ५६ वर्षांनंतर, २०७० च्या दरम्यान, हवामान बदलाचे परिणाम प्रखर झालेले असतील, आणि मुंबई पाण्याखाली जाईल, असा या संस्थेचा निष्कर्ष आहे.