जावयाच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या सासरे, सासूसह अन्य नातेवाइकांच्या जीपला अपघात होऊन सासू-सासरे व सून यांच्यासह चार जण मरण पावले, तर नऊ जण जखमी झाले. सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावर लिंबी चिंचोळी गावच्या हद्दीत पॉवरग्रीड प्रकल्पासमोर शनिवारी दुपारी सव्वाच्या सुमारास हा अपघात झाला. वळसंग पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथे राहणारे भीमराव ऊर्फ गुंडप्पा नागप्पा साळुंखे (वय ६५) यांचे जावई शिवाजी रामा पवार (रा. मड्डी वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) यांचे शनिवारी सकाळी ह्दयविकाराने निधन झाल्याची माहिती समजताच जावयाच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी साळुंके कुटुंबीय व त्यांचे नातेवाईक भाडय़ाची जीप ठरवून सोलापूरकडे निघाले होते. भरधाव निघालेल्या या जीपला (एमएच १३ बी २३४६) लिंबी चिंचोळी (ता. दक्षिण सोलापूर) येथे पॉवरग्रीड प्रकल्पासमोर अपघात झाला. जीपच्या डाव्या बाजूचा मागचा टायर फुटल्याने जीप पालथी झाली आणि त्याचवेळी समोरून येणारा कॅन्टर (एमएच ३१ सीबी ३३४०) सदर जीपवर धडकला. या भीषण अपघातात भीमराव साळुंखे यांच्यासह त्यांच्या पत्नी बाणाबाई भीमराव साळुंखे (वय ५८) तसेच त्यांची सून रुक्मिणी विठ्ठल साळुंखे (वय ३५) व भीमाबाई यल्लप्पा माने (वय ६५) हे चौघेजण गंभीर जखमी होऊन मरण पावले. तर अन्य नऊजण जखमी झाले. जखमींमध्ये मृत भीमराव यांचा मुलगा विठ्ठल साळुंखे (वय ४०) हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर दुसरा मुलगा लक्ष्मण साळुंखे (वय ५०) हादेखील जखमी झाला आहे. अन्य जखमींमध्ये नागूबाई बसवन चौगुले (वय ३५), मल्लम्मा महादेव साळुंखे (वय ४०), जनाबाई तिप्पण्णा विटकर (वय ५०), तिप्पण्णा मरगू विटकर (वय ६०), लक्ष्मीबाई सिध्दाराम पिटाळकर (वय ४०) यांचा समावेश आहे. कॅन्टरचालक शंकर शिवानंद बाबानगरे (रा. वळसंग, ता. दक्षिण सोलापूर) हासुध्दा जखमी झाला आहे. या सर्वाना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शेतीचा व्यवसाय करणारे भीमराव साळुखे यांचे जावई मृत पावल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी ते आपली पत्नी, दोन्ही मुले, सुना व अन्य नातेवाईकांसह सोलापूरकडे येत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. या अपघातामुळे त्यांच्या मुलीवरील पतीसह स्वत:चे आई-वडील यांचे छत्र एका क्षणात हरपले.