मनमाडहून फुलंब्रीकडे जाणाऱ्या टँकरला टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात कन्नड तालुक्यातील हतनूर येथील दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य २५ जण जखमी झाले. रंजना संतोष पंडित (वय २५) व अर्चना शिवाजी काळे अशी मृतांची नावे आहेत. विवाह सोहळ्यानंतर कन्नडकडे परतत असताना मंगळवारी पहाटे हा अपघात झाला.
औरंगाबाद शहरापासून ३५ किलोमीटर अंतरावर सराईफाटा येथे मनमाडहून फुलंब्रीकडे जाणाऱ्या डिझेल टँकरला टेम्पोने धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले.
टँकरचा वाहनचालक यास खासगी रुग्णालयात दाखल केले असून अन्य जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. टेम्पोचा चालक शेख माजिद यालाही अपघातानंतर रुग्णालयात दाखल केले. मात्र, तो तेथून पळाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.