सायन-पनवेल महामार्गाचे सुरू असलेले रुंदीकरणाचे काम वाहनचालकांच्या जिवावर बेतत आहे. रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या कामांमुळे या ठिकाणी अपघातांना निमंत्रण मिळत आहे. सोमवारी रात्री खारघरजवळ स्वारगेट-मुंबई एस.टी. बसला झालेल्या अपघातामुळे तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी एस.टी. बसचालकाला खारघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तुकाराम अप्पा पाटील (७७), यशोदा तुकाराम पाटील (७०) आणि अनिता शरद पाटील (४५) अशी जखमींची नावे असून त्यांना बेलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रात्री पावणेअकराच्या सुमारास पुण्याहून मुंबईकडे एस.टी. येत असताना खारघर येथील हिरानंदानी पुलाजवळ आल्यावर कशाचा तरी जोरदार आवाज झाल्याने घाबरलेल्या बसचालक नानासाहेब कोकरे यांनी बस अचानक वळवल्याने झोपेत असलेले प्रवासी सीट, खिडकी आदीवर आदळले. यामध्ये तीन जणांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बसचा चालक कोकरे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

महामार्ग रुंदीकरणाच्या बेशिस्त कामामुळे अपघातांमध्ये वाढ
सायन-पनवेल महामार्गावर खारघर येथे रस्त्याच्या रुंदीकरणानंतर आता सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे वाहतुकीवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहेत. या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या यंत्रामुळे जोरदार आवाज होत असल्याने वाहनचालकांचे लक्ष विचलित होत असल्यानेदेखील अपघात होत आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यात ठेवण्यात येत असलेल्या साहित्यामुळेदेखील अपघातांना निमंत्रण मिळत आहे. हिरानंदानी पुलाजवळ चार दिवसांपूर्वी झालेल्या कार अपघातात दोन जण ठार, तर एक जण जखमी झाला होता. दोन दिवसांपूर्वी रस्त्यात ठेवलेल्या सिमेंट ब्लॉकला स्कूल बस धडकली. सुदैवाने बसमध्ये विद्यार्थी नव्हते, मात्र यामुळे तब्बल एक तास वाहतूक ठप्प झाली होती.