जिल्ह्याची जमीन सुपीक व पाण्याचीही उपलब्धता आहे. अशा वेळी राजकारणाच्या गप्पा मारून वेळ दवडण्यापेक्षा शेतकऱ्यांनी शेतीवर भर द्यावा, असा सल्ला पालकमंत्री सुरेश धस यांनी दिला.
गंगाखेड शुगर्सच्या पाचव्या गळीत हंगामाचा प्रारंभ झाला. गंगाखेड शुगर्सचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे, आमदार बाबाजानी दुर्राणी, संचालिका सुदामती गुट्टे, जि. प. सदस्य राजेश विटेकर, लक्ष्मण मुंढे, भगवान सानप, विशाल कदम, प्रमोद साळवे, यज्ञेश्वरमहाराज सेलूकर आदी उपस्थित होते. वारकरी संप्रदायातील मान्यवरांचा सत्कार या वेळी करण्यात आला.
मंत्री धस म्हणाले की, परभणी जिल्ह्यास सर्व काही अनुकूल स्थिती असताना केवळ राजकारणाची चर्चा करण्याऐवजी विकासावर भर देणे आवश्यक आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांना स्वतंत्र जलवाहिनी करण्यासाठी जास्तीत जास्त अनुदान देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मागेल त्याला रोहयोअंतर्गत विहिरीचा लाभही मिळवून देणार असल्याचे सांगून धस यांनी संतांची समाज सुधारण्याची परंपरा आजही वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून चालू असल्याचे सांगितले.
गुट्टे यांनी गंगाखेड शुगर्सच्या वतीने साखर कारखान्याच्या माध्यमातून परिसर विकासालाही प्राधान्य देण्यात आल्याचे सांगितले. मजबूत रस्ते बांधणी, शेतकरी हितासाठी दूध डेअरीचा विकास प्रकल्प, जलसंधारणासाठी बांधलेले बंधारे, बेरोजगारांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अशा विविध माध्यमांतून परिसराचा विकास करण्यात येत असल्याचे सांगितले. कारखान्याचा मोळी टाकण्याचा कार्यक्रम यज्ञेश्वरशास्त्री सेलूकरमहाराज व विजयानंदमहाराज सुपेकर यांच्या हस्ते पार पडला.