कार्यकर्त्यांच्या ताकदीच्या आधारावरच नेतृत्व उभे राहात असते, हे लक्षात घेऊन नेतृत्वाने कार्यकर्त्यांना अधिक ताकद देणे आवश्यक आहे. शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्त झालेल्या अभय आगरकर यांनी शहर भाजपमध्ये ‘कारभा-या’ची भूमिका बजावत सर्वाना बरोबर घेऊन काम करावे, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे यांनी आज केले.
नियुक्तीबद्दल शहर भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आगरकर यांचा फरांदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार दिलीप गांधी, आमदार राम शिंदे, उपमहापैर गीतांजली काळे आदी उपस्थित होते.
आगरकर यांच्या घराण्यास समाजसेवेची मोठी परंपरा आहे. त्यातूनच विचार, आचारांची एकरूपता त्यांच्यात निर्माण झाली आहे, ती केवळ न सांभाळता त्यात वाढ करावी, असेही फरांदे म्हणाले. या वेळी त्यांनी आपण आता राजकीय भूमिकेतून निवृत्त झालो असल्याचेही जाहीर केले.
नगर शहरात भाजपची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची तसेच युतीतही भाजपचा सन्मान राखला जाण्याची आवश्यकता खासदार गांधी यांनी व्यक्त केली. आपण आगरकर यांच्या कामात हस्तक्षेप करणार नाही, परंतु दिशा दाखवण्याचे काम करू, कार्यकर्त्यांनीही नगरचे चित्र बदलण्यासाठी आगरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकावा, त्यांनी कार्यकारिणी करताना सर्वाना न्याय द्यावा, जे पक्ष सोडून गेले त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही गांधी म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना आगरकर यांनी पक्षसंघटनेत आलेली शिथिलता दूर करून ती मजबूत करण्याला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. मनपा निवडणुकीचे आव्हान पेलण्यासाठी आपल्याला सर्वाचीच मदत लागेल, असे आवाहन करून आगरकर म्हणाले, की शहरात नवीन कार्यकर्त्यांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी प्रत्येक प्रभागात अर्ज वाटप केले जाणार आहे, शहरातील विकासाचा असमतोल दूर करण्यासाठी विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार केली जाईल. कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
आमदार राम शिंदे, काळे, सुनील रामदासी, गीता गिल्डा, अन्वर खान आदींची भाषणे झाली. महिला आघाडीच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल सुरेखा विद्ये यांचा फरांदे यांनी गौरव केला. अनंत जोशी यांनी स्वागत केले. अशोक कानडे यांनी आभार मानले. या वेळी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.