डोंबिवली गावची जत्रा म्हणून मागील बारा वर्षांपासून प्रसिद्ध असलेला ‘आगरी महोत्सव’ येत्या १ डिसेंबरपासून सुरू होत आहे. ८ डिसेंबपर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवात आगरी समाज, संस्कृतीविषयक प्रदर्शन, साहित्य संस्कृतीवर व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम आदींची भरगच्च मेजवानी आहे. १५० स्टॉल्सच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी नागरिकांना करता येणार आहे. महापालिकेच्या सावळाराम महाराज क्रीडा संकुलात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती संयोजक गुलाब वझे यांनी दिली. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज महाविद्यालयाच्या उभारणीच्या निधी संकलनासाठी मागील बारा वर्षांपासून आगरी महोत्सव आयोजित केला जातो. या वास्तूसाठी शासनाकडून जागा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे वझे यांनी स्पष्ट केले. या महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा रागरंग’, या परिसंवादात माधवी वैद्य, ह. मो. मराठे, अरुण म्हात्रे, रविप्रकाश कुलकर्णी सहभागी होणार आहेत. तर ‘सामाजिक मूल्यांची जपणूक’ कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे व्याख्यान होणार आहे. प्रा. मच्छिंद्र व सुशीला मुंडे यांचे ‘विज्ञानाच्या दुर्बिणीतून अंधश्रद्धा’ विषयावर व्याख्यान होणार आहे. डॉ. वंदना म्हात्रे, डॉ. गजेंद्र भानजी यांची ‘महिला सक्षमीकरण’वर व्याख्याने होणार आहेत. ‘आयपीएल’ चित्रपटाच्या कलाकारांशी चर्चा ठेवण्यात आली आहे. ‘आगरी समाजाची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक दशा व दिशा’ परिसंवादात राजन वेळुकर सहभागी होणार आहेत. ‘प्रेमासाठी कमिंग सून’ चित्रपटाच्या कलाकारांशी हितगुज आणि आगरी-कोळी नृत्यांचा बहारदार कार्यक्रम दररोज होणार आहेत, असे गुलाब वझे यांनी सांगितले.