युवावर्गास अधिकाधिक संख्येने कृषी क्षेत्राकडे वळविण्याच्या उद्देशाने येथील डोंगरे वसतीगृह मैदानावर आयोजित ‘कृषी २०१३’ या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजता कृषीमंत्री राधाकृष्ण विखे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.ह्युमन सव्र्हिस फाऊंडेशन आणि मीडिया एक्झिबिटर्स यांच्या वतीने आयोजित या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात ३५० तालुक्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे ३५० युवा शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. कृषी प्रदर्शन श्रृंखलेतील हे आठवे प्रदर्शन आहे. युवकांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे हा प्रदर्शनाचा उद्देश असल्याची माहिती संयोजक संजय न्याहारकर यांनी दिली. प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी, शेतीतज्ज्ञ, संशोधक, उद्योजक आणि शासकीय यंत्रणा यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. याव्दारे नवनवीन तंत्रज्ञान, संकल्पना, विचारांची देवाण-घेवाण, समस्या, त्यावरील उपाय, आदी सर्व एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. यात भारतातील प्रमुख खत, औषध कंपन्या, दुग्ध प्रक्रिया उद्योग, ट्रॅक्टर व यंत्रसामग्री उत्पादक, बँका व शेतीशी संबंधित प्रमुख कंपन्या, संस्था व शासकीय विभागांचा सहभाग राहणार आहे. प्रदर्शनास इतर राज्यातील शेतकरीही भेट देणार आहेत. प्रदर्शनात विविध प्रकारची आधुनिक औजारे, तंत्रज्ञान, मार्गदर्शन दिले जाणार आहे. शिरपूर येथे जलसिंचनाचा आगळा वेगळा उपक्रम राबविणआरे सुरेश खानापूरकर यांचे प्रदर्शन स्थळी शुक्रवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत ‘दुष्काळ हटविण्याचा प्रभावी उपाय’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी अशोक सोनवणे हे प्रास्तविक करतील. भरत कावळे अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती देण्यात आली आहे.