पाण्याच्या दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करतांना अत्यंत अशोभनीय वक्तव्य करून दुष्काळग्रस्तांच्या व महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावणाऱ्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व दुष्काळी परिस्थिती असतांना चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांच्यावर पैशाची उधळण केली गेली, या दोन्ही घटनांचा निषेध करीत चिखलीत पवार व आमदार बोंद्रे, तर देऊळगावराजात पवार यांच्या पुतळ्याचे मनसेकडून दहन करण्यात आले.
दरम्यान, चिखली येथील तहसीलदारांना निवेदन देऊन आमदार बोंद्रेंच्या निलंबनाची मागणी सेना-भाजप व जनशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
देऊळगावराजा येथील मनसेच्यावतीने दत्ता काळे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुध्द घोषणा देऊन अजित पवार यांनी बेताल वक्तव्य करून दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात माणूसकीची सीमा पार केली. दुष्काळग्रस्त परिस्थिती पदाचे भान न ठेवता बेताल वक्तव्य करणाऱ्या पवार यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशा स्वरूपात निषेध व्यक्त करून उपमुख्यमंत्री पवार यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. याप्रसंगी दत्ता काळे, सतीश खुपसे, रामेश्वर माने, जितेंद्र खंदारे, ऋषिकेश खांडेभराड, दत्ता जावळे, शिवाजी मापारी, संदीप कायंदे आदींची उपस्थिती होती.
चिखली येथील छत्रपती चौकात दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाईवर बोलतांना जनतेची टगेगिरी करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार व पैशाची उधळण केल्याप्रकरणी आमदार राहुल बोंद्रेंविरुध्द घोषणाबाजी व निषेध करून या नेत्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
यावेळी मनसेचे मदनराजे गायकवाड, राजेश परिहार, शैलेश गोंधणे, गणेश बरबडे, शैलेंद्र कापसे, प्रदीप भवर, बंटी कपूर, रवी पेटकर, प्रवीण महाडीक, संदीप नरवाडे, राधेश्याम कुळकर्णी, महेश सोनुने, गजानन इंगळे, सुनील ठेंग, भागवत काळे, अजहर शेख, सोमनाथ तायडे, अलिम शेख यांची उपस्थिती होती, तर याच घटनांच्या अनुषंगाने चिखलीचे आमदार बोंद्रे यांचा निषेध व्यक्त करून जनतेचे सेवक म्हणविणारे सत्ताधिकारी कॉंग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांच्यावर कार्यकर्त्यांनी एका कार्यक्रमात नोटा उधळून दुष्काळग्रस्तांची थट्टा केली. याप्रकरणी आमदार बोंद्रेंचा निषेध व्यक्त करीत राजीनाम्याची मागणी सेना-भाजप, युवा सेना व जनशक्ती संघटनेच्या वतीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदन देताना डॉ.प्रतापसिंग राजपूत, सुरेशआप्पा खबुतरे, अ‍ॅड.विजय कोठारी, अर्जुन नेमाडे, आनंदराव हिवाळे, निलेश अंजनकर, कपिल खेडेकर, पंडितराव देशमुख, श्रीराम झोरे, रामकृष्ण शेटे, रोहित खेडेकर, साहेबराव पाटील, गोपाल बाहेती, पांडूरंग होने, प्रीतम गैची, बिटृू ठाकूर, नंदू खंडेलवाल, समाधान शेळके, भिवसन केवट, शंकरराव भालेराव, दिलीप डागा, डिगांबर पेंटर, भगवान वाळेकर, गजानन पवार, नारायण खरात, सतनाम वधवा, दत्ता सुसर यांची उपस्थिती होती. दरम्यान, उपरोक्त दोन्ही घटनांनी निषेध व पुतळ्यांचे दहन इत्यादींनी चिखलीतील वातावरण चांगलेच तापल्याचे पहावयास मिळाले.