शेतक-यांच्या नावावर राजकारण करावयाचे व जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी करावयाची हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खरा चेहरा जनतेसमोर आल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी श्रीगोंदे येथे केली. येथील नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता झाली. तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ते बोलत होते. पालकमंत्री मधुकर पिचड, आमदार बबनराव पाचपुते, पक्षाचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, जि.प.चे अध्यक्ष विठ्ठल लंघे, आमदार शंकरराव गडाख, बिपीन कोल्हे आदी या वेळी उपस्थित होते. पवार यांनी या वेळी खासदार राजू शेट्टी यांच्यासह काँग्रेसवरही टीका केली. ते म्हणाले, कोरडवाहू शेती, अंधश्रद्धाविरोधी विधेयक अशी अनेक कामे राज्य सरकारने केली असून सरकार गतिमान आहे. श्रीगोंदे पालिकेत राष्ट्रवादीचीच सत्ता येईल असा दावा त्यांनी केला. काँग्रेसला येथे सर्व जागांवर उमेदवारही उभे करता आले नाही. पालिकेत राष्ट्रवादीला एकहाती सत्ता द्या, येथे विकासाची गंगा आणू असे आश्वासन पवार यांनी दिले.