महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन घोषित करण्यात आल्यामुळे गुणवंताचा शोध घेण्यासाठी विविध शिक्षण संस्थांमध्ये चढाओढ लागली आहे. प्रत्येक महाविद्यालय आमच्याच महाविद्यालयाचा विद्यार्थी ‘टॉपर’ असल्याचे दावे- प्रतिदावे करीत आहे.
गेल्या सहा वर्षांपासून बारावी आणि दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादी बंद करण्यात आल्यामुळे कोण कुठल्या शाखेतून पहिला किंवा दुसरा आहे हे कळायला मार्ग नसला तरी निकालाबाबत प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता दिसून आली. शहरातील आंबेडकर महाविद्यालय, शिवाजी विज्ञान महाविद्यालयात, हिस्लॉप, धरमपेठ, सोमलवार, जी एस कॉमर्स, कमला नेहरू महाविद्यालय, बिंझाणी महिला महविद्यालय आदी महाविद्यालये व शाळांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार केली जात होती. प्रत्येकजण महाविद्यालयातील ‘टॉपर’ कोण याचा शोध सुरू असून अनेक महाविद्यालय आमच्या विद्यालयातील विद्यार्थी प्रथम असल्याचा दावा करीत होते. ९६ टक्के गुण असलेल्या शिवाजी विद्यालयातील दोन विद्यार्थिनी तर आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थिनीला ९७ टक्के गुण मिळाल्याचा दावा महाविद्यालयातून करण्यात आला.
नागपूरच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी गोपाल एस. बन्सुले या विद्यार्थ्यांला ९६.३३, अस्मिता गडेकरला ९६. १६ आणि किरण बारापात्रेला ९४. ८३ टक्के गुण मिळाले आहे. आंबेडकर महाविद्यालयातील अनुम खान या विद्यार्थिनीला ९७.९ टक्के चंद्रा मालूला ९५ टक्के तर अतीन खोपाला ९४ टक्के गुण मिळाले आहे. वाणिज्य विभागात नागपूरच्या आंबेडकर महाविद्यालयातील सुस्मिता विनोद या विद्यार्थिनीला ९३ तर भक्ती देव हिला ९१ टक्के गुण मिळाले आहेत. कला शाखेत एलएडी महाविद्यालयाची सोनाली मार्डीकर हिला ८६ टक्के गुण मिळाले आहेत. जीएस कॉमर्स, एल ए डी महाविद्यालय, हिस्लॉप महाविद्यालय, रामदासपेठ, कमला नेहरू महाविद्यालय, सोमलवार रामदासपेठ, धरमपेठ महाविद्यालय आदी महाविद्यालयात ‘टॉपर’ विद्यार्थी जाहीर केले जात आहे. शिवाजी विज्ञान महाविद्यालयात ९० टक्केच्यावर २७ विद्यार्थी तर आंबेडकर महाविद्यालयात ३६ विद्यार्थी आहे. वाणिज्य विभागात ८० टक्क्याच्यावर १६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आंबेडकर आणि शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील ९० टक्क्याच्यावर असलेली यादी यावेळी मोठय़ा प्रमाणात घसरली. शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे ८५ टक्क्च्यावर १६० विद्यार्थी आहेत. रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रात विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहे. केमेस्ट्रीचा पेपर कठीण निघाल्यामुळे तो पुन्हा घेण्याची मागणी करण्यात आली होती मात्र शिक्षण मंडळाने ती नाकारली. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला असल्याचे शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य बुरघाटे यांनी सांगितले.  पूर्वी गुणवत्ता यादी घोषित झाल्यानंतर प्रत्येक शाखेतील गुणवत्ता विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यासाठी प्रसारमध्यामांची धडपड असायची. विशेषत विविध वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी गुणवंताच्या मुलाखती घेण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांची पळवापळवी करीत होते. विद्यार्थ्यांचे सत्कार केले जात होते. त्यांच्या निवासस्थानी अभिनंदन करणाऱ्यांची गर्दी होत असे मात्र, आता गुणवंत विद्यार्थ्यांना केवळ पास झालो यावर समाधान मानावे लागत आहे. शिक्षण मंडळाने ऑन लाईन निकाल घोषित केल्यामुळे शहरातील बहुतेक इंटरनेट कॅफेवर आणि ज्यांच्याकडे इंटरनेटची सोय आहे अशा ठिकाणी निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी दिसून आली. दरवर्षी ज्या विद्यार्थ्यांला जितके जास्त पारितोषिक तो विद्यार्थी प्रथम असा असे निकष मंडळाने लावले होते मात्र, ऑनलाईन पद्धतीने निकाल घोषित केल्यामुळे मंडळाने सांराश पुस्तिका आणि पारितोषिकांची यादी घोषित केली नाही. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत प्रथम कोण आणि दुसरा कोण आहे यांचा शोध घेण्यासाठी प्रसार माधमासह विविध शिक्षण संस्थामध्ये चढाओढ लागली होती. शिक्षण मंडळात विदर्भातून पहिला कोण आहे, राज्यातून पहिला कोण आहे, पहिल्या क्रमांकाला किती टक्के गुण मिळाले अशी विचारपूस केली जात होती पण, मंडळाचे अधिकारी त्याबाबत काहीच माहिती देऊ शकत नव्हते. शहरातील शिवाजी महाविद्यालय, आंबेडकर महाविद्यालय, धरमपेठ, जी एस महाविद्यालय, सोमलवार रामदासपेठ आदी महाविद्यालयात दुपारी १२ नंतर विद्यार्थी जमू लागले. बहुतेक शाळा महाविद्यालयात इंटरनेटवरून विद्यार्थ्यांना निकाल सांगितले जात होते.