अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने २००५ व २००८ मध्ये पेन्शन लागू करण्याबाबत निर्णय घेतले. परंतु आजतागायत त्याची अंमलबजावणी केली नाही. ही अंमलबजावणी करावी, या व अन्य मागण्यांसाठी आयटक संलग्न राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने सोमवारी (दि. ९) नागपूर विधानभवनावर पायदळ मोर्चाचे आयोजन केले आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधून अंगणवाडीसेविका व मदतनीस त्यांच्या न्याय्य, प्रलंबित मागण्यांसाठी पायी नागपूर विधानभवनावर धडक मारणार आहेत. निवृत्तीनंतर एकरकमी लाभाची मागणी मान्य होईपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, सेविका व मदतनीस यांच्या मानधनातील तफावत दूर करावी आदी मागण्या आहेत. अंगणवाडी सेविका, मदतनिसांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य अध्यक्ष सुकुमार दामले, राज्य कार्यध्यक्ष दिलीप वटाणे, राज्य सरचिटणीस माधुरी क्षीरसागर आदींनी केले आहे.