राजकीय ‘आश्रय’ देण्यास उदार पण ‘हात’ मात्र नाकारणारपक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोपावरून राष्ट्रवादीतून निष्कासित करण्यात आलेले माजी आमदार अण्णासाहेब देशमुख-पारवेकर यांनी राजकीय अस्तित्वासाठी कॉंग्रेसशी सलगी साधणे सुरू केले असून, कांॅग्रेस नेत्यांनीही त्यांना ‘राजकीय आश्रय’ देण्याबाबत उदार धोरण स्वीकारल्याचे चित्र दिसत आहे. अर्थात, अण्णासाहेब पारवेकरांचा पूर्व इतिहास लक्षात घेता त्यांना कॉग्रेसमध्ये प्रवेश मात्र देऊ नये, असे पक्षातील अनेकांचे प्रामाणिक मत आहे. अण्णासाहेब पारवेकरांचा राजकीय प्रवास कांॅग्रेसच्या माध्यमातूनच झाला असला तरी आमदारकी मिळविण्यासाठी त्यांनी १९९० मध्ये तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांच्या जनता दलात प्रवेश घेऊन यवतमाळातून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी कांॅग्रेसच्या विजया जांबुवंतराव धोटे यांचा पराभव करून त्यांना तिसऱ्या क्रमांकावर फेकले होते. नंतर पारवेकरांनी सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असतांना पुन्हा आमदारकीसाठीच जनता दलाचा त्याग करून कांॅग्रेसचा ‘हात’ धरला होता. विशेष म्हणजे, कॉंग्रेसने १९९५ च्या निवडणुकीत त्यांना यवतमाळातूनच उमेदवारी दिली. मात्र, यावेळी जनतेने ‘दलबदलू’ चा ठपका लागलेल्या पारवेकरांना परभूत करून भाजपच्या राजाभाऊ ठाकरेंना ५० हजार ३८४ मतांनी निवडून दिले होते. राजाभाऊ ठाकरेंनी अण्णासाहेबांचा १७ हजार ७४७ मतांनी पराभव केला होता. पुढे अण्णासाहेब पारवेकरांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ‘घडय़ाळ’ बांधले. मात्र, कांॅग्रेसचा ‘हात’ पूर्णपणे सोडलेला नव्हता. ही बाब राष्ट्रवादीच्या आमदार संदीप बाजोरिया यांच्यासह मंत्री मनोहर नाईक यांच्यापासून तर सामान्य कार्यकर्त्यांनाही आवडले नाही. विशेषत पांढरकवडा नगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेसचा ‘हात’ धरून पारवेकरांनी ‘घडय़ाळ’ चे वाजवलेले बारा राकांॅ नेत्यांना सहन झाले नाही. अखेर प्रदेश राष्ट्रवादीने पारवेकरांवर कारणे दाखवा नोटीस बजावण्याची औपचारिकता पूर्ण करून त्यांना पक्षातून निष्कासित करून टाकले. परिणामत राजकीय वनवासात गेलेल्या पारवेकरांना पुन्हा कॉंग्रेसचाच ‘हात’ धरण्याची वेळ आल्याची चित्र दिसत आहे. गमंत म्हणजे, कांॅग्रेस पारवेकरांना फक्त सलगीचे बोट धरू देते पण, पूर्ण ‘हात’ देण्यास तयार नाही. अण्णासाहेबांचा राजकारणातील प्रभावाचा कॉंग्रेसलाही फायदाच होणार आहे आणि अण्णासाहेबांना राजकीय वनवासातून कांॅग्रेसच्या हाताचा थोडाफार आश्रय लाभणार आहे. अलिकडे कॉंग्रेसच्या कार्यक्रमात अण्णासाहेबांना अध्यक्षपदाचा मान देणे सुरू झाले आहे. मात्र, आपली ‘मान’ अण्णासाहेबांच्या हाती द्यायला कांॅग्रेस तयार नाही, हे कटू वास्तव आहे. या निमित्याने राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा शत्रु किंवा मित्र असत नाही, या लॉर्ड एॅक्टनच्या विधानाची सत्यता पटायला लागली आहे. आज राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर यांचे आणि अण्णासाहेब पारवेकरांचे संबंध लक्षात घेऊन त्यांना राम-लक्ष्मणाची जोडी संबोधले जात असे. मात्र, या दोघांमध्ये देखील विस्तव सुध्दा जात नाही अशी स्थिती आहे. पारवेकरांची कॉग्रेसशी निर्माण होत असलेली सलगी किती दिवस टिकेल हाही चच्रेचा विषय आहे.