तुळजापूरसाठी औद्योगिक वसाहत मंजूर करण्याची घोषणा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी केली. सोलापूर लगतच्या भागात औद्योगिकीकरणाला त्यामुळे चालना मिळण्याची शक्यता आहे. मात्र, राणे यांची ही घोषणा म्हणजे अप्रत्यक्षपणे निवडणुकीचा बिगुल वाजविल्याची चर्चा सुरू झाली आहे.
तुळजापूर हे राज्यातील आघाडीचे तीर्थक्षेत्र असून या क्षेत्राच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्न झाले. दुग्धविकास मंत्री मधुकर चव्हाण यांनी यापूर्वी मराठवाडा वैधानिक विकास महामंडळात काम करताना राज्य सरकारच्या कृष्णा खोरे विकास महामंडळाचा तुळजापूरला चांगला फायदा मिळवून दिला. या अंतर्गत ७० साठवण तलावांची उभारणी करून तालुक्यातील कोरडवाहू जमीन बागायती करण्याला चालना दिली. ३२५ कोटींचा तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमही सध्या प्रगतिपथावर आहे. मराठवाडय़ाचे न्याय्य हक्काचे २५ टीएमसी पाणी मिळवून देणाऱ्या मराठवाडा कृष्णा खोरे योजनेचे काम तुळजापूरमध्ये सुरू आहे. पालकमंत्री चव्हाण यांनी आपल्या कारकिर्दीत अधिकाधिक विकासकामे पूर्ण करून घेतली.
औद्योगिक वसाहतीला मंजुरी मिळण्यातही मंत्री चव्हाण यांनी आघाडी घेतल्याने तालुक्यासह सोलापूर परिसरातील उद्योग उभारणीचा मनोदय असणाऱ्या घटकांना दिलासा मिळाला. सुमारे २०० ते २५० एकर क्षेत्रावर सोलापूर मार्गावर सांगवी, दहिवडी, मसला, काटी शिवारातील जमीन या वसाहतीसाठी उपयोगात आणली जाणार असल्याचे सांगण्यात येते. सोलापूरनजीक तामलवाडी परिसरात समाधानकारक उद्योग उभारले असल्याने तामलवाडी, काटगाव, िपपळा, सावरगाव, काटी भागातील जनतेला त्याचा लाभ झाला.
तामलवाडी भागालगतच आता नवीन प्रस्ताव सादर झाल्यास ३० किलोमीटर महामार्गाचे अर्थकारण यामुळे वाढणार आहे. तालुक्यातील औद्योगिक प्रकल्प वाढीस लागण्याबरोबरच नोकऱ्या उपलब्ध करण्यातही याचा उपयोग होणार आहे. उद्योगमंत्री राणे यांनी औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव समोर येताच त्याला मंजुरी देण्याचे आश्वासन दिले, तसेच पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे योजना पूर्ण करण्याचे चांगले कौशल्य असल्याने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता सुरू होण्याअगोदर ही अंतिम मंजुरी व भूमिपूजन होण्याची चिन्हे आहेत. साहजिकच तुळजापूर औद्य्ोगिक वसाहतीचे भूमिपूजन म्हणजे आगमी लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा बिगुल ठरणार आहे.