रेल्वेमंत्र्यांनी प्रवासी भाडय़ात वाढ केलेली नसली तरी अन्य मार्गाने प्रवाशांच्या खिशाला कात्री लावलीच आहे. त्यामुळे भाडय़ात वाढ नाही, हे म्हणणे दिशाभूल करणारे आहे. ‘तात्काळ’च्या शुल्कात वाढ केली असून तिकीट रद्द करण्याचे शुल्क आणि आरक्षण शुल्कातही वाढ झाली आहे. मुंबईकरांसाठी कोणतीही भरीव तरतूद या अर्थसंकल्पात नाही.  
मागील अर्थसंकल्पात रेल्वे मंत्रालयाने ज्या घोषणा केल्या होत्या, त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. किमान यंदाच्या अर्थसंकल्पात तरी त्या दिशेने काही पावले टाकली जायला हवी होती.  ते ही झालेले नाही. पनवेल रेल्वे स्थानक संपूर्ण देशाशी जोडले जाईल, पनवेल येथे कोच टर्मिनल तर कळंबोली येथे कोच मेन्टेनन्स उभारण्याची घोषणा मागील अर्थसंकल्पात करण्यात आली होती. मात्र अद्याप त्याचे काम झालेले नाही. हार्बर रेल्वे मार्गावर बारा डब्यांची गाडी सुरू करण्याचे आश्वासन गेल्या वर्षी देण्यात आले होते. मात्र येथेही या गाडय़ा सुरू झालेल्या नाहीत. हा रेल्वे अर्थसंकल्प म्हणजे ‘वादे है, करनेके इरादे नही’ अशा प्रकारचा आहे.     
    ’  सुभाष गुप्ता (यात्री संघ अध्यक्ष)
——————-
वेलंकनी यात्रेकरूंचा अपेक्षाभंग
वेलंकनी यात्रेसाठी मुंबईतून सुमारे ६० हजार भाविक जातात. त्यांच्या सोयीसाठी दादर ते वेलंकनी गाडी सुरू करण्याची मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. खा. संजय निरुपम, प्रिया दत्त यांनीही त्याला पाठिंबा दिला होता. यंदाही ही गाडी सुरू न झाल्याने यात्रेकरूंचा अपेक्षाभंग झाला आहे.   
    ’  चार्ली रोझारिओ
(समन्वयक महाराष्ट्र वेलंकनी यात्रेकरू संघटना)