सकाळी दहा वाजले तरी अनेक रस्त्यांवरचे दिवे तेवत असतात, तर रात्रीचे दहा वाजले तरी काही रस्त्यांवरील दिव्यांचा प्रकाश पडत नसतो. हे प्रकार वर्षांनुवष्रे देशांतील अनेक रस्त्यांवर पाहावयास मिळतात. यावर तोडगा काढण्यासाठी मात्र फारसे कुणी पुढे येताना दिसत नाही. पण परळ येथील महर्षी दयानंद महाविद्यालयातील हरिश्चंद्र निषाद या विद्यार्थ्यांने यावर तोडगा काढला असून त्याच्या या संशोधनाला मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवरचे तिसरे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्य़ातील एका गावात शिकलेल्या हरिश्चंद्रला लहानपणापासूनच संशोधनाची आवड आहे. त्याच्या गावात जेमतेम दोन तास वीज असायची. रेशनवर एक ते दोन लिटर केरोसीन मिळायचे. त्यात घरातील चूल आणि अभ्यासासाठीचा दिवा दोन्हींचा वापर होणे शक्य नव्हते. मग त्याने यावर विचार करण्यास सुरुवात केली. कधी रेडिओचे पार्ट उघडून बघ तर कधी मोबाइल उघडून बघ हे हरिश्चंद्राचे आवडते काम. यातूनच त्याने मोबाइलच्या टाकाऊ बॅटरीपासून दिवा तेवण्याचे तंत्र शोधून काढले. या बॅटरीला एलईडी बल्ब लावून त्याने स्वत:चे घर प्रकाशमान केले. यानंतर त्याने गावातील अनेक मुलांच्या घरी ही सुविधा उपलब्ध करून दिली. ही बॅटरी चार्ज करण्यासाठी सोलार पॅनेलचा त्याने वापर करण्यास सुरुवात केली. त्याच्या या संशोधनाचे अनेकांनी कौतुक केले. यातूनच त्याला भौतिकशास्त्राची आवड निर्माण झाली आणि तो शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबईत दाखल झाला. परळ येथील महर्षी दयानंद महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्याने आपले संशोधनाचे काम सुरू ठेवले होते.त्याचा हा प्रकल्प इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये मांडण्यात आला होता. त्याच्या या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावरचे तिसरे पारितोषिक देऊन त्याचा गौरव करण्यात आला. प्रकल्प साकारताना महाविद्यालयातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. रवींद्र उपाध्याय व डॉ. अविनाश कारंडे यांचे मार्गदर्शन लाभल्याचेही तो सांगतो. भविष्यात याचा प्रत्यक्षात वापर करण्याचा त्याचा मानस असून तो संबंधितांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.स्वयंचलित नियंत्रण असे होते देशाला विजेची कमतरता भासत असतानाच रस्त्यावरील दिव्यांच्या मानवचलित प्रणालीमुळे विजेचे नुकसान होते ही बाब हरिश्चंद्रला खटकली. यातूनच त्याने स्वयंचलित नियंत्रण व्यवस्था निर्माण करण्याचा ध्यास घेतला. मग त्याने एक उपकरण विकसित केले. जे उपकरण आपण विजेच्या दिव्याच्या खांबावर लावले की सूर्यप्रकाश जसा कमी होईल तसे दिवे जळू लागतील व पुन्हा सूर्यप्रकाश जसा वाढू लागेल तसा दिव्यांचा प्रकाश कमी होऊ लागेल. यासाठी त्याने लाइट डिपेंडंट रजिस्टर (एलडीआर) चा सेन्सर म्हणून वापर केला. यामध्ये स्वयंचलित प्रणाली बसवून एक उपकरण तयार केले. हे उपकरण विजेच्या खांब्याला जोडल्यास ते अपेक्षित काम करते. यामुळे आपण एक ते दोन तास वाया जाणारी वीज वाचवू शकतो असा दावा हरिश्चंद्र करतो.