जिल्हय़ातील कृषिप्रक्रिया उद्योगास प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन आमदार अमित देशमुख यांनी केले. जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बाजार समितीतील दगडोजीराव देशमुख सभागृहात ५८ आदर्श शेतकरी व ३० पशुपालकांना पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.
माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, आमदार वैजनाथ िशदे, जि. प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, बांधकाम व आरोग्य सभापती कल्याण पाटील, चंद्रकांत मद्दे, बालाजी कांबळे, बसवराज पाटील नागराळकर, पांडुरंग चेवले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी लक्ष्मण पवार आदी उपस्थित होते. जिल्हय़ातील शेतकरी ऊस, सोयाबीन पिकांचे विक्रमी उत्पादन घेतात. डाळ, सोयाबीन आदी पिकांचे भाव लातूर येथे ठरविण्यात येतात, याचे सर्व श्रेय शेतकऱ्यांना जाते. दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना गाय, म्हशी देण्याचा प्रस्ताव देशमुख यांनी मांडला. जि. प. अध्यक्ष बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले. उद्धव फड यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. लक्ष्मण पवार यांनी आभार मानले.