आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्यांसाठी वैद्य बिंदुमाधव कट्टी स्मृत्यर्थ राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आयुर्वेद व्यासपीठ, नाशिकचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व औरंगाबाद येथील छत्रपती शाहूमहाराज शिक्षण संस्था संचालित आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत २४ आयुर्वेद महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
उद्योगपती पद्माकरराव मुळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. प्राचार्य श्रीकांत देशमुख, राजेश उपाध्याय, वैद्य सुहास खर्डीकर, संतोष नेवपूरकर, सोहन पाठक, आनंद कट्टी आदी या वेळी उपस्थित होते. पुण्याच्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयाने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना रोख ५ हजार रुपये, देवगिरी चषक व प्रमाणपत्र देण्यात आले. आकुर्डी आयुर्वेद महाविद्यालयाने दुसरा, तर छत्रपती शाहूमहाराज शिक्षण संस्थेच्या आयुर्वेद महाविद्यालयाने तिसरा क्रमांक मिळविला. या व्यतिरिक्त पहिले तीन क्रमांक मिळविणाऱ्या गटास पद्माकरराव मुळे यांनी ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपये विशेष प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर केले. आयुर्वेद व्यासपीठातर्फेही अनुक्रमे ३ हजार, २ हजार व १ हजार रुपयांचे रोख पारितोषिक, चषक, सुवर्ण, रजत व कांस्यपदक देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून आयुर्वेद महाविद्यालयाचे उपप्राचार्य वैद्य राजेश उपाध्याय, वैद्य जयश्री देशमुख, वैद्य अनघा नेवपूरकर, वैद्य पेंडसे, वैद्य काळे, वैद्य टोंगे व डॉ. प्रदीप आवळे यांनी काम पाहिले.