युवा, सौजन्य –
वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी पक्षाने तिकीट नाकारलं असतानाही तो अपक्ष म्हणून निवडून आला आणि नगरसेवक झाला. आता तो चाललाय जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत राजकारणाबद्दलची आपली मतं मांडण्यासाठी..
लोकशाही व्यवस्थेत सत्ताकारणावर अंकुश ठेवायचा असेल तर राजकारण अपरिहार्य ठरते. मात्र बहुतेक उच्चशिक्षित तरुणांना राजकीय क्षेत्रात काम करणे कमीपणाचे वाटते. त्यामुळे त्यापासून चार हात दूर राहणेच ते पसंत करतात. त्यामुळे नको त्या प्रवृत्ती राजकारणात बहुसंख्येने सक्रिय राहतात आणि लोकशाही व्यवस्थेच्या आडून प्रत्यक्षात सरंजामशाहीच राज्य करीत राहते. शाळा महाविद्यालयात टवाळक्या करणारे, अभ्यासात जेमतेमच असणारे संसदीय मार्गाने निवडून येऊन लोकप्रतिनिधी बनतात. शहराचे, राज्याचे अथवा देशाचे धोरण ठरवितात आणि त्यांच्यापेक्षा किती तरी हुशार असणारे त्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात धन्यता मानतात. भारतीय लोकशाहीचे हे अध:पतन रोखायचे असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधिमंडळ ते थेट संसदेपर्यंत सर्वच स्तरावर लोकप्रतिनिधी म्हणून उच्चशिक्षित तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होणे गरजेचे आहे.
चार वर्षांपूर्वी बदलापूर शहरात कॅ. आशीष दामले या तरुणाने ही हिंमत दाखवली. अमेरिकेतून पायलट प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करून परतलेल्या अवघ्या २२ वर्षांच्या आशीष पुढे तेव्हा करिअरसाठी खूप चांगले पर्याय होते. शिवाय वडिलोपार्जित व्यवसायही होता. मात्र घरात राजकीय पाश्र्वभूमी असल्याने त्याने नगरपालिका निवडणुकीत स्वत:ला अजमवायचे ठरविले. त्यानुसार त्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे रीतसर तो ज्या विभागात राहतो, त्या बेलवली प्रभागातून तिकीटही मागितले. मात्र या राजकीय लढाईत तुझा निभाव लागणार नाही, असे कारण पुढे करीत त्याला तिकीट नाकारण्यात आले. अर्थात आशीष तसेच त्याच्या समवयस्क मित्रांना पक्षाने सांगितलेले कारणे पटली नाहीत. राजकारणात आपण अननुभवी असू पण हेतू तर चांगले आहेत, यावर त्यांचा विश्वास होता. मग आशीष मागे हटला नाही. त्याने अपक्ष म्हणून निवडणुकीत स्वत:ला आजमविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार निवडणूक लढवून तो जिंकूनही आला आणि वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी तो नगरसेवक झाला.

आशीषची वाटचाल
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या कार्य कर्तृत्वाचा विशेष ठसा उमटविणाऱ्या जगभरातील १८ ते ३० वयोगटातील तरुणांची आंतराष्ट्रीय परिषद (वन यंग वर्ल्ड समीट-२०१३) दरवर्षी भरवली जाते. यंदा परिषदेचे चौथे वर्षे आहे. यंदा ही परिषद दक्षिण अफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे २ ते ५ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. ‘वन यंग वर्ल्ड’चे संस्थापक डेव्हिड जोन्स यांनी या परिषदेसाठी भारतातील प्रतिनिधी म्हणून नगरसेवक आशीष दामले याची निवड केली आहे. तो या परिषदेत ‘लीडरशिप अॅण्ड गव्हर्नन्स’, ‘रोल ऑफ यंगस्टर्स इन पॉलिटिकल सिस्टीम’ आणि ‘व्हाय यंगस्टर्स अॅक्रॉस द वर्ल्ड फील दॅट पॉलिटिक्स इज नॉट रिस्पेक्टेबल प्रोफेशन’ या विषयांवर परिषदेत बोलणार आहे. परिषदेत संयुक्त राष्ट्र संघटनेने माजी सचिव कोफी अन्नान, नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस, टेनिसपटू बोरिस बेकर आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर युवकांना मार्गदर्शन करणार आहेत.
राष्ट्रवादी पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर बदलापूर पालिकेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवून चार वर्षांपूर्वी वयाच्या अवघ्या २२ वर्षी नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तसेच युवाराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला तसेच युवकांसाठी विविध उपक्रम राबवीत आहे. या परिषदेच्या निमित्ताने स्थानिक राजकारणात सक्रिय असणारा एक उच्चशिक्षित तरुण आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपली मते तसेच अनुभव मांडणार आहे…

bjp leader sanjay kshirsagar to join sharad pawar ncp
मोहोळमध्ये भाजपचे असंतुष्ट नेते संजय क्षीरसागर राष्ट्रवादी शरद पवार गटात, शरद पवारांच्या उपस्थितीत  होणार पक्षप्रवेश
lok sabha elections 2024 udayanraje bhosale declared bjp candidate from satara
साताऱ्याची जागा भाजपने बळकावली; राष्ट्रवादीला धक्का; ठाणे, रत्नागिरी, नाशिकचा तिढा कायम
pankaja munde
“वर्गणी काढून मला घर बांधून द्या, मी मरेपर्यंत…”, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
Mira-Bhainder NCP district president Mohan Patil arrested
राष्ट्रवादी मिरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांना अटक, शैक्षणिक संस्थेत घोटाळा केल्याचा आरोप

अर्थात त्याच्या या यशात बदलापूरमधील युवकांचा मोठा वाटा होता. पक्षीय मतभेद बाजूला सारून शहरातील युवकांनी त्याला पाठिंबा दिला होता. सर्वसाधारणपणे अपक्ष नगरसेवक त्रिशंकू अवस्थेत सत्ताधाऱ्यांकडून केवळ पदे टिकविण्यासाठी वापरले जातात असा समज आहे. आशीष दामलेही त्यास अपवाद ठरला नाही. त्यानेही बदलत्या राजकीय समीकरणात एक वर्ष शहराचे उपनगराध्यक्ष भूषविले. मात्र केवळ रस्ते, पायवाटा आणि दिवाबत्ती या टिपिकल पालिकेच्या चाकोरीत तो अडकला नाही. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तसेच शहरात स्वत: स्थापन केलेल्या युवराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्याने तरुण तसेच महिलांसाठी विविध प्रशिक्षण शिबिरे राबवली. शासकीय पॉलिटेक्निकच्या माध्यमातून महिलांसाठी दोन महिने कालावधीचे टेलरिंग तसेच फॅशन डिझायनिंगचे अभ्यासक्रम त्याने बदलापूरमध्ये सुरू केले. त्याचप्रमाणे दोन महिन्यांचा संगणक प्रशिक्षण अभ्यासक्रमही युवकांना उपलब्ध करून दिला. गरजू महिलांना खादी ग्रामोद्योग विभागामार्फत फिनाईल, साबण, मेणबत्ती, स्कूल बॅग बनविण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहनही दिले. दरवर्षी युवादिनी बदलापूरमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आशीष दामले मित्र परिवारच्या वतीने आयोजित करण्यात येतो. जोहान्सबर्ग येथील परिषदेत राजकारणाविषयी तरुणांना तिटकारा का वाटतो याबाबत तो आपले विचार व्यक्त करणार आहे. तसेच जगभरातील तरुणांना याविषयी नेमके काय वाटते, हेही जाणून घेण्याचा तो प्रयत्न करणार आहे. कोफी अन्नानसारख्या आंतरराष्ट्रीय मुत्सद्दय़ांचे मार्गदर्शन या परिषदेच्या निमित्ताने त्याला लाभणार आहे.
पहिले ते राजकारण
आता जगभरात सर्वच क्षेत्रात भारतीय तरुण अतिशय देदीप्यमान कामगिरी करताना दिसतात. दुर्दैवाने राजकारणाबाबत मात्र भारतीय सुशिक्षित तरुण उदासीन आहे. आपला त्यात निभाव लागणार नाही, असे त्याला वाटते. मात्र लोकशाही व्यवस्थेत देशाचे धोरण ठरविणारे आणि त्यांची परिणामकारक अंमलबजावणी होते की नाही हे पाहणारे लोकप्रतिनिधी मूलत: राजकारणीच असतात. त्यामुळे लोकशाही व्यवस्था बदलायची असेल तर आधी चांगल्या विचारांच्या तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने राजकारणात यायला हवे, असा आशीषचा आग्रह असतो. गेल्या पालिका निवडणुकीत अनेक प्रस्थापितांना धूळ चारत मिळविलेल्या विजयाचे श्रेय तो तरुणांना देतो. राजकारणात राहून समाजकारण करण्याचा धडा मात्र त्याने त्याची आई दर्शना दामले यांच्यापासून गिरविला. दर्शना दामले महिला सबलीकरणासाठी खासदार सुप्रिया सुळे संचालित यशस्विनी अभियानाच्या समन्वयिका आहेत. बदलापूरच्याच कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये शिकलेल्या आशीषने उल्हासनगरच्या आर.के.टी. महाविद्यालयातून बारावी केली. त्यानंतर तो अमेरिकेत पायलटच्या प्रशिक्षणासाठी गेला. राजकारणात नसता तर तो आता एक व्यावसायिक पायलट असता. सर्वसाधारणपणे नगरसेवकाचे कार्यक्षेत्र प्रभाग अथवा विभागापुरते मर्यादित राहते. आशीष मात्र त्यास अपवाद ठरला. शहरातील चांगल्या विचारांच्या तरुणांनी एका व्यासपीठावर यावे म्हणून त्याने ‘युवाराज प्रतिष्ठान’ची स्थापना केली. कारण त्याला कोणत्याही एका विशिष्ट पक्षाच्या राजकीय चौकटीत अडकायचे नव्हते. त्यामुळे बदलापूरमधील डावे-उजवे सर्व विचारांच्या तरुणांना एकत्र आणण्याचा त्याचा प्रयत्न आहे. केवळ एखाद्याने पालिका निवडणूक जिंकून उपयोग नाही. कारण लोकशाही व्यवस्थेत बहुमतांनी निर्णय घेतले जातात. तिथे अनेकदा चांगले हेतू आणि विचार पुरेशा पाठिंब्याअभावी मागे पडतात, हेही आशीषने अनुभवले आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीनंतर पालिकेतील युवकांचे संख्याबळ वाढविण्याचा आपला प्रयत्न असेल, असेही तो सांगतो. गेली चार वर्षे विवेकानंद जयंतीनिमित्त युवाराज प्रतिष्ठानच्या वतीने बदलापूरमध्ये युवादिन साजरा केला जातो.
यशवंतराव प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या तंबाखूविरोधी अभियानाचा राज्य समन्वयक म्हणून गेली एक वर्ष आशीष कार्यरत आहे. त्यानिमित्ताने राज्यभर त्याची भटकंती सुरू असते. यासंदर्भात काढण्यात येणाऱ्या रॅली, परिषदा, स्वाक्षरी अभियानाचे नेतृत्व करण्याची संधीही त्याला मिळाली. राजकारणात राहून समाजकारण करीत असल्याच्या गप्पा जवळपास सर्वच राजकीय नेते मारत असतात. प्रत्यक्षात या त्या मार्गाने सामाजिक संस्थांना उपकृत करून मांडलिक करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आशीषने मात्र पदापर्णातच आपल्या कृतीतून सामाजिक उपक्रमांप्रती असलेली निष्ठा दाखवून दिली आहे. त्याच्यासाठी राजकारण म्हणजे केवळ निवडणुका जिंकणे आणि त्यानंतर केवळ बेरीज-वजाबाकीची गणितं करणं एवढय़ापुरतं मर्यादित नाही. गेली चार वर्षे एक अपक्ष नगरसेवक म्हणून राजकारण तसेच समाजकारणात वेगळ्या वाटा शोधताना आलेले अनुभव आशीष जोहान्सबर्गमधील परिषदेत मांडणार आहे.