गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत गुलाल आणि डॉल्बीला पूर्णत: बंदी घालण्यात आली असून, पोलिसांनी मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिलेल्या ६१ सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे यांनी केले.कराड ग्रामीण आणि शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी, शांतता, गुन्हे नियंत्रण, पर्यावरण समितीचे कार्यकर्ते, विविध संघटनांच्या पदाधिका-यांच्या बैठकीत ते बोलत होते. तहसीलदार सुधाकर भोलसे, मलकापूरचे मुख्याधिकारी हेमंत निकम, कराड शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सुर्वे, बी. आर. पाटील, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन जगताप यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. पोलिसांनी दिलेल्या ६१ सूचना (६१ कलमी) कार्यक्रमावर प्रारंभी कार्यकर्त्यांत अस्वस्थता होती, मात्र उपस्थित मान्यवरांनी खुलासे केल्यानंतर ही अस्वस्थता काहीशी कमी झाली.मितेश घट्टे म्हणाले,‘‘लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने हा उत्सव सुरू केला तो उद्देश बाजूला पडून उत्सव न राहता गणेश फेस्टिव्हल झाला आहे. या सणाचे पावित्र्य राखून तो फेस्टिव्हल होऊ नये याकरिता सर्वानी प्रयत्न करायला हवेत. या उत्सवातून समाज बिघडण्यापेक्षा समाजाला घडविण्यासाठी आजच्या युवा पिढीने पुढे यायला हवे. आम्ही ज्या ६१ सूचना दिल्या आहेत त्याचे सर्वानी पालन केले तर आमच्यातील पोलीस जागा करायची वेळ येणार नाही. आमचा पोलीस ताणतणावाखाली राहिला नाही तर तोही तुमच्याबरोबर उत्सवात निश्चितच सहभागी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हिंदू एकताचे प्रदेश उपाध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी हिंदूंच्या सणावेळीच ध्वनिक्षेपकावर मर्यादा का, इतरांना ही मर्यादा का घातली जात नाही, असा सवाल करीत सर्वाना समान न्याय असावा अशी न्याय मागणी केली. कराडची मंडळे कायदा पाळणारी असून, डॉल्बी, गुलालबंदी योग्य आहे. त्याचे पालन केले जाईल. रात्री १२ वाजण्यापूर्वी मिरवणूक पार पडावी. यासाठी आम्ही सहमत आहोत. मात्र, उत्सवकाळातील शेवटच्या पाच दिवसांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाला परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी पावसकर यांनी केली.