राज्याचे नेते विलासराव देशमुख यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने देशभर लातूरची पत निर्माण केली. त्यांची प्रेरणा, विचार, दृष्टी घेऊन वाटचाल करून लातूरची पत कायम ठेवण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन आमदार अमित देशमुख यांनी केले.
लातूर मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा प्रारंभ आमदार देशमुख यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसंतराव नागदे उपस्थित होते. आमदार वैजनाथ शिंदे व विक्रम काळे, माजी आमदार पाशा पटेल, जि.प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, मनपा स्थायी समिती सभापती अ‍ॅड. समद पटेल, जि.प. सदस्य दगडू पडीले, अ‍ॅड. बाबुराव बंडगर आदी उपस्थित होते.
आमदार देशमुख म्हणाले की, विलासराव देशमुख यांनी लातूरचा सर्वागीण विकास केला. लातूरसाठी आम्ही सर्व एक आहोत. लातूर मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटीच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाने एक पाऊल पुढे टाकले आहे. यूपीए सरकारने आणलेल्या एफडीएमुळे जगातील पैसा खेडोपाडी पोहोचून सर्वसामान्यांचा विकास होणार आहे. सोयाबीनला चांगला भाव मिळावा म्हणून पाशा पटेल यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर आपण पाठपुरावा करू, असेही आमदार देशमुख यांनी सांगितले. प्रास्ताविक पतसंस्थेचे अध्यक्ष जे. जी. सगरे यांनी, सूत्रसंचालन गालिब शेख यांनी केले. पी. एन. बंडगर यांनी आभार मानले.