गेल्या वर्षभरात प्रशासन, पदाधिकारी, गटनेते आणि लोकसहभागातून नागपूर शहरात केलेल्या विकास कामांमुळे ‘बेटर सिटी’ म्हणून शहराला ओळखले जात आहे, असा दावा करून येणाऱ्या काळात लोकपयोगी आणि विकासाभिमुख कामांना अधिक गती देण्याचा प्रयत्न करणार असल्याचा संकल्प महापौर अनिल सोले यांनी केला आहे.
गेल्यावर्षी ५ मार्चला महापौर म्हणून पदभार सांभाळल्यानंतर एक वर्षांच्या कालावधीत केलेल्या विकास कामासंदर्भात अनिल सोले पत्रकारांशी बोलत होते. शहराच्या विकासासंदर्भातील अनेक आव्हाने होती त्याप्रमाणे विकास कामाचा अजेंडा ठरविण्यात आला होता. त्याप्रमाणे शहरात ७० चे ८० टक्के काम झाले असून त्यातील काही योजनांचे लोकार्पण करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात शहराच्या विकासात जनतेचा मिळालेला प्रतिसादामुळे अनेक रखडलेली काम करणे शक्य झाले आहे. महापालिकेचे उत्पन्नाचा स्रोत वाढविताना जनतेवर आर्थिक बोझ पडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. पाणी, रस्ते, वीज, वाहतूक यासह नागरी समस्येच्या संदर्भात अनेक प्रशासकीय अडचणी आल्या असल्या तरी त्यातून मार्ग काढून ती कामे करण्यात आली आहे.
एलबीटीच्या संदर्भात सोले म्हणाले. राज्य सरकारने एलबीटीच्या संदर्भात निर्णय घेतला असला तरी त्या संदर्भातील कुठलाही आदेश नाही. एलबीटी लागू झाल्यास आम्ही त्यास विरोध करणार असून न्यायालयात जाण्याची आमची तयारी आहे. राज्य सरकारने एलबीटी लागू करण्यापूर्वी महापालिकेचा आर्थिक स्रोत वाढविण्यासाठी स्वंतत्र निधीची तरतूद करावी आणि त्यानंतरच तो लागू केला तर आमची काहीच हरकत नाही मात्र, जकात बंद करून कुठल्या अतिरिक्त निधीची तरतुद न करता एलबीटी लागू केला तर विरोध करू. सभागृहात या विषयावर चर्चा होण्यासंदर्भात आयुक्तांना प्रस्ताव देण्यात आला आहे. वर्षभराच्या कार्यकाळाचे मूल्यमापन करताना चांगले प्रशासन देण्यासोबतच लोकाभिमूख योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे आणि येणाऱ्या काळात शहराच्या विकासकामांना गती देत नागरिकांना मूलभूत सुविधा कशा मिळतील त्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन सोले यांनी दिले.