भारतीयांनी आपली शक्ती ओळखून स्वत:मध्ये नवा आत्मविश्वास जागवल्यास भारत विश्वविजयी होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन रामकृष्ण मिशन आश्रमाचे प्रमुख स्वामी विष्णुपादानंद महाराज यांनी केले. समन्वय मंचातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध पंथोपंथातील धर्माचार्याना एका व्यासपीठावर आणून त्यांच्या हस्ते भारतमाता प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. डॉ. आनंदजी भन्ते, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. नवनाथमहाराज आंधळे, महानुभव पंथाचे संतोषमुनी कपाटे, आचार्य श्रवणचैतन्यमहाराज, शीख संप्रदायाचे भाईश्री खडकसिंगजी ग्रंथी, समन्वय मंचाचे केंद्रीय मंत्री बाळासाहेब नाईक उपस्थित होते.डॉ. आनंदजी भन्ते यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेला बौद्ध धर्म आणि लिहिलेली घटना यामुळेच आज आपण एकत्र आहोत, असे म्हटले. सर्व पंथ, संप्रदाय समन्वयाने एकत्र राहिले तरच मातृभूमीचे रक्षण करता येईल, असे मत खडकसिंगजी ग्रंथी यांनी मांडले. इतरांना स्वीकारण्याचा गुण हिंदूंमध्ये आहे, असे प्रतिपादन श्रवणचैतन्यमहाराज यांनी केले. तर दुसऱ्यांच्या मताचा आदर करणे हीच भारतमातेची पूजा आहे, असे प्रतिपादन संतोषमुनी कपाटे यांनी केले. प्रास्ताविक रामदास लहाबर यांनी केले. राजीव जहागीरदार यांनी सूत्रसंचालन केले.