आज जिल्ह्यात विकासाचे चित्र रंगवले जाते. ते खरे नाही. भुजबळांनी स्वत:चा विकास केला. जिल्ह्याचा नाही. गुंडगिरी व भ्रष्टाचार त्यांच्याच आशीर्वादाने पोसला जात आहे, असा आरोप शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी केला. नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे
यांच्या प्रचारार्थ नाशिकरोड विभागातील कार्यकर्त्यांचा मेळावा पाटीदार भवनात झाला. यावेळी ते बोलत होते.सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे चित्र विरोधकांकडून रंगविले जात असल्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित काम करण्याचे आवाहनही गायकवाड यांनी केले. व्यासपीठावर महानगरप्रमुख अजय बोरस्ते, माजी महापौर बाळासाहेब सानप, महिला आघाडीच्या सुनिता आडके, भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, विजय साने आदी उपस्थित होते. आडके, क्षीरसागर, साने यांनीही मार्गदर्शन केले. शिवसेना महानगरप्रमुख बोरस्ते यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी हेमंत गोडसे यांची घरोघरी जाऊन ओळख करून देण्याची गरज व्यक्त केली. केवळ गर्दी, मेळावे, भाषणे यावर अल्पसंतुष्ट राहून चालणार नाही. ही लढाई केवळ एका उमेदवारासाठी किंवा पक्षासाठी नसून देशासाठी असल्याचे त्यांनी सांगितले.