दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर होताच शहरातील विविध नामाकिंत शिकवणी वर्गासाठी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची चांगल्या शिकवणी वर्गाच्या शोधासाठी धावाधाव सुरू झाली आहे. दुपारी निकाल जाहीर झाल्यानंतर तासाभरात शहरातील नामांकित शिकवणी वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी शहरातील काही नामांकित शिकवणी वर्गासमोर पालक आणि त्यांच्या पाल्यांची गर्दी दिसून आली.
दहावीनंतर बारावीत चांगले गुण मिळावे यासाठी शहरातील काही नामांकित खाजगी शिकवणी वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांसहीत त्यांच्या पालकांची धडपड सुरू झाली आहे. शहरातील लक्ष्मीनगर, रामदासपेठ आणि रेशिमबाग परिसरात काही खाजगी शिकवणी वर्गासमोर दुपारी ३ नंतर पालक आणि त्यांच्या पाल्याची गर्दी दिसून आली. ज्या विद्यार्थ्यांला दहावीमध्ये ८५ ते ९० टक्के गुण आहेत अशा विद्यार्थ्यांना शिकवणी वर्गात प्रवेश दिला जात आहे.  शहरातील अनेक खाजगी शिकवणी वर्गांनी दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच शहरातील विविध भागात शिकवणी वर्गाच्या जाहिराती करण्यासाठी शहरात मोठमोठे होर्डिग्ज लावले असून विद्यार्थ्यांना अभ्यासाचे पॅकेज देण्यात आले.