लातूर जिल्हय़ात दुष्काळ जाहीर करावा, या व अन्य मागण्यांसाठी भाजप ग्रामीणच्या वतीने रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मागील दोन वर्षांपासून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. माणसांना व जनावरांना प्यावयास पाणी नाही. शेतमजूर व शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही. सक्तीची वीजबिल वसुली करण्यात येत आहे, ती त्वरित थांबवावी. लातूर, रेणापूर व औसा तालुक्यांत टंचाईग्रस्त स्थिती जाहीर करावी.
रोजगार हमी योजनेमधून गावातील अंतर्गत रस्ते, शिवरस्ते, पाझर तलावाची कामे चालू करावीत. जनावरांसाठी मंडलनिहाय चारा छावण्या सुरू कराव्यात. जलसंधारणाची सर्व कामे चालू करावीत. शेतकऱ्यांचे वीजबिल पूर्ण माफ करावे आदी मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन केले होते.मोर्चात भाजप तालुकाध्यक्ष हणमंत नागटिळक, श्रीकृष्ण जाधव आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. आगामी १५ दिवसांत मागण्यांची पूर्तता न झाल्यास १० एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.