सर्वसामान्य कष्टकरी जनतेचे नेते माजी खासदार दि.बा. पाटील यांच्या ८९व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्यावरील ‘कष्टकऱ्यांचा असामान्य योद्धा’ या पुस्तकाचे प्रकाशन जेएनपीटीमधील न्हावा-शेवा बंदर कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आले.१९८४ साली सिडको व महाराष्ट्र शासनाविरोधात नवी मुंबई व उरण-पनवेलमधील शेतकऱ्यांचे आंदोलन केले. या आंदोलनातूनच शेतकऱ्यांना अनेक सुविधा प्राप्त झाल्या आहेत. देशभरात शेतकऱ्यांना त्यांच्या संपादित जमिनीच्या मोबदल्यात विकसित जमीन देण्याचे तत्त्व मान्य करण्यात आलेले आहे, ते दि.बां.च्या आंदोलनाचे देणे आहे. या लढय़ातून शेतकरी व कष्टकऱ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी जेएनपीटी बंदरातील न्हावा-शेवा बंदर कामगार संघटनेने दि.बा. पाटील यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन केले. या पुस्तकाचे लेखन किशोर घरत यांनी केले आहे. जेएनपीटी कामगार वसाहतीतील बहुद्देशीय सभागृहात पार पडलेल्या प्रकाशन सोहळ्याला दि.बां.चे सहकारी व आगरी समाजाचे नेते का.ध. पाटील, ज्येष्ठ समाजसेवक नाना पाटील, बहुजन नेते सुरेश पाटील, युनियनचे अध्यक्ष एम.एस. कोळी, कार्याध्यक्ष गणेश घरत, जे.डी. तांडेल आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. यावेळी जेएनपीटी बंदरातील जे भूमिपुत्र कामगार कायमस्वरूपी नोकरीत आहेत ते दि.बा. पाटील यांनी दिलेल्या लढय़ाचे फलित आहे. त्यामुळे दि.बां.च्या आंदोलनाचा विसर पडता कामा नये, असे मत भूषण पाटील यांनी व्यक्त केले.