नव्या पिढीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याची आणि विचारांची महिती व्हावी यासाठी त्यांचे साहित्य प्रकाशित करण्यात येत आहे. ज्या व्यक्ती किंवा संस्थांकडे बाबासाहेबांचे हस्तलिखित आहे, त्यांनी ते राज्य शासनाला द्यावे असे आवाहन करून बाबासाहेबांचे विचार देशभर पोहचविण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  केले.
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्ताने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एक दिवसाच्या विदर्भ दौऱ्यांवर आले असता त्यांनी दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून घालून
अभिवादन केले त्यावेळी ते बोलत होते. नव्या पिढीला बाबासाहेबांचे विचार कळावेत आणि ते देशभर पोहचावेत म्हणून हस्तलिखित प्रकाशित करण्यास शासनाचा अग्रकम आहे. प्रकाशित केलेल्या साहित्यात काही त्रुटी असल्यास त्यात दुरुस्ती केली जाईल. याशिवाय ज्या व्यक्ती आणि संस्थांकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हस्तलिखित साहित्य आणि किंवा काही आठवणी असेल तर त्यांनी शासनाला उपलब्ध करून द्यावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंचे जतन करण्यात येत आहे. या शिवाय फुटाळा तलाव येथील बुद्धिस्ट पार्कला विलंब होत असला तरी ते काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे असा राज्य शासनाचा मानस असून त्यानुसार काम करण्यात येणार आहे. दीक्षाभूमीच्या विकासासाठी शासनाने वेळोवेळी मदत केली असून विकासासंदर्भातील काही कामे असतील तर त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. यावेळी रोहयो मंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री राजेंद्र मुळक, खासदार विलास मुत्तेमवार, आमदार दीनानाथ पडोळे, शहर जयप्रकाश गुप्ता आदी उपस्थित होते.