वाचनसंस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या अक्षरधारा व रोहन प्रकाशन यांच्या वतीने उद्यापासून (गुरुवार) पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २६ मेपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे. अक्षरधाराचे हे ४७५ वे प्रदर्शन आहे. औरंगपुरा येथील बलवंत वाचनालयात आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता होणार आहे. प्रदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व साहित्याचे विशेष दालन मांडण्यात येणार असून या पुस्तकांवर १५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. पुस्तकांबरोबरच डॉ. आंबेडकर यांच्यावरील सीडी/व्हीसीडी/ तसेच कॉफी मग उपलब्ध असणार आहेत. प्रदर्शनात एक हजार रुपयांच्या छापील खरेदीवर ३०० रुपयांची छापील किमतीची पुस्तके भेट योजनाही राबविली आहे. याचबरोबर २०, ३०, ४० व ५० टक्के अशा विशेष सवलतीच्या पुस्तकांचे स्वतंत्र दालन प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. तसेच रोहन प्रकाशनच्या कोणत्याही पुस्तकावर २० टक्के सवलत असून त्यांनी प्रकाशित केलेल्या ‘असा घडला भारत’ हा ग्रंथही विशेष सवलतीत देण्यात येणार आहे. सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे. वाचकप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अक्षरधाराचे व्यवस्थापक श्रावण राठोड यांनी केले आहे.