मोदी सरकारने काढलेल्या भूसंपादन वटहुकुमाच्या विरोधात आता बहुजन समाज पक्षदेखील रस्त्यावर येणार आहे. या वटहुकुमामुळे शेतकरी देशोधडीला लागतील तर उद्योगपतींना शेतकऱ्यांचे जमिनी हडपण्याचे रान मोकळे मिळणार आहे. या विरोधात बसपच्या वतीने २ मे रोजी संविधान चौकात धरणे-निदर्शने करण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारने लोकसभेत भूसंपादन विधेयक मांडले आहे. याआधी देखील हे विधेयक लोकसभेत संमत झाले. परंतु राज्यसभेत ते नामंजूर होणार या भीतीने सरकारने हे विधेयक मांडण्याची हिम्मत केली नाही. या विधेयकाला सर्वच विरोधी पक्षांचा विरोध आहे. परंतु या विरोधात प्रमुख विरोधीपक्ष काँग्रेसने आघाडी घेतली आहे. त्यात आता बसपने उडी घेतली असून, राष्ट्रीय स्तरावर धरणे-निदर्शने कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. संविधान चौकात दिवसभर निदर्शने करण्यात येतील. यात विदर्भातील सर्व जिल्ह्य़ातील बसप कार्यकर्ते, समर्थक व शेतकरी सहभागी होणार आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. परंतु केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न देता केवळ घोषणा करून त्याच्या हिताकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी नीतीच्या विरोधात या धरणे-निदर्शनात प्रकाश टाकण्यात येणार आहे. या कार्यक्रमात बसपचे राष्ट्रीय महासचिव व प्रदेश प्रभारी अ‍ॅड. खासदार वीरसिंग, प्रदेशाध्यक्ष विलास गरुड, प्रदेश उपाध्यक्ष कृष्णाजी बेले, प्रदेश सरचिटणीस किशोर गजभिये उपस्थितीत राहतील. प्रदेश सचिव रमेश जनबंधू, अहमद कादर, उत्तम शेवडे, प्रभाकर गेडाम, झेड.आर. दुधकुवर, दादाराव धांडे आदी नेते मार्गदर्शन करतील.