विविध मागण्यांच्या पुर्ततेकरिता जिल्ह्य़ातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.
महाराष्ट्रातील ८० टक्के जनतेला आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या व ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. २००९-१० मध्ये सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पूर्वलक्ष लाभ मिळालेला नाही, अस्थायी ७८९ एमएएमएस वैद्यकीय अधिकारी गट ब आणि अस्थायी ३२ बीडीएस वैद्यकीय अधिकारी गट व यांचे सेवावेशन झाले नाही, एक जानेवारी २००६ पासून राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू झालेला नाही. वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना केंद्र शासन व वैद्यकीय शिक्षण विभागाप्रमाणे उच्चवेतन मिळाले नाही, यासह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधावे, याकरिता हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या आंदोलनात डॉ. बंडू रामटेके, डॉ. संदीप गेडाम, डॉ. प्रकाश नगराळे, डॉ. आनंद किन्नाके, डॉ. उत्तम पाटील, डॉ. दिगंबर मेश्राम, डॉ. सुभाष इंगळे, डॉ. अंकुश राठोड, डॉ. सचिन उईके, डॉ. माधुरी मेश्राम, डॉ. अडवानी, डॉ. किशोर भट्टाचार्य, डॉ. बालाजी विल्लरवार यांच्यासह जिल्ह्य़ातील अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश होता.