सब टीव्हीवरची ‘लापतागंज’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यामुळे आता दुसरे पर्व घेऊन ‘लापतागंज’चे अजबगजब विश्व ‘सब’वर परतले आहे. मागच्या पर्वात बिजी आणि सुरिली या तरुण प्रेमी युगुलाची कथा विवाहबंधनात अडकून मालिका संपली होती. आता दुसऱ्या पर्वात त्यांच्या प्रेमाच्या लग्नाची गोष्ट सुरू होणार आहे. मात्र, या पर्वात बिजी कायम असला तरी सुरिलीचा चेहरा मात्र बदलला आहे. याआधी प्रीती अमिन सुरिलीची भूमिका करत होती. तिच्या जागी आदिती तेलंग या नव्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.

बिजी आणि सुरिलीची गोष्ट लोकांना फार आवडून गेली होती. कारण, नोकरीधंदा न करणारा आणि केवळ सुरिलीवर प्रेम करणारा बिजी मौसीला अजिबात आवडत नव्हता. मौसीला पटवण्यासाठी कितीतरी खटपटी-लटपटी करून बिजीने सुरिलीला लग्नासाठी राजी केले. या दोघांचे लग्नही झाले. मात्र, बिजीच्या प्रेमाची कथा अजून संपलेली नाही. या पर्वातही सुरिलीशी लग्न झालेले असूनही पूर्वीसारखेच तिला एकवार पाहण्यासाठी बिजीने मौसीच्या घराबाहेर ठिय्या मांडला आहे आणि बिजीच्या या वेडेपणाला काय करायचे हे न सुचून मौसी वैतागली आहे. ‘लापतागंज’च्या नव्या पर्वाची कथा ही या वळणावरून पुढे सरकणार आहे.

सुरिली आणि बिजीच्या गोष्टीत फक्त एकच बदल झाला आहे तो म्हणजे सुरिलीचा. यापूर्वी प्रीती अमिन आणि अब्बास खान यांनी सुरिली आणि बिजीच्या प्रेमकथेत रंग भरले होते. अब्बास आणि प्रीतीची ऑफ स्क्रीन केमिस्ट्रीही तितकीच धम्माल होती, त्यामुळे ऑन स्क्रीनही या जोडीच्या गमतीजमतीही लोकांना विशेष भावल्या.

आता मात्र प्रीतीची या मालिकेतून गच्छंती झाली असून तिच्या जागी अदिती तेलंग या अभिनेत्रीचा प्रवेश झाला आहे. बिजीच्या भूमिकेत मात्र अमिन कायम असून आता ही नवी जोडी त्यांच्या कुटुंबीयांबरोबर ‘लापतागंज’च्या नव्या-नव्या कथा रंगवणार आहे.