महानगरपालिकेने शासनाकडे वाढीव चटई क्षेत्र मिळण्याबाबत प्रस्ताव पाठवूनही मुख्यमंत्री त्याला मंजुरी देत नाही. त्यामुळे इमारती जीर्ण होऊन स्लॅब कोसळण्याच्या घटनेला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला.  
तुभ्रे गावातील नगरसेविका आणि भाजपच्या पक्ष प्रतोद विजया घरत यांनी तुभ्रे गावात इमारतीच्या छताचे प्लास्टर निखळून एका मुलाच्या मृत्यू झाल्याची लक्षवेधी सभागृहात मांडली. त्यावर राष्ट्रवादीचे नगरसेवक वैभव गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्र्याना लक्ष केले. शहारातील जुन्या बांधकामांच्या पुनर्बाधणीसाठी नगरविकास विभागाकडे वाढीव चटई क्षेत्र मिळण्याबाबतचा प्रस्ताव शासनदरबारी धूळ खात पडला आहे.  पालकमंत्री गणेश नाईक व आमदार संदीप नाईक यांनी वारंवार पाठपुरावा करून विधानसभेत लक्षवेधी मांडूनही याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे ते म्हणाले.