पंढरपूर तालुक्यातील खेड भाळवणी येथून प्रशांत विनायक साळुंखे (१८) या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले असून हे अपहरण नेमके कोणी व कशासाठी केले, याचा उलगडा झाला नाही. यासंदर्भात पंढरपूर तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत.
प्रशांत साळुंखे हा पंढरपूरच्या विवेक वर्धिनी कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकतो. परीक्षा जवळ आल्याने रात्री उशिरापर्यंत अभ्यास करीत बसला असताना अज्ञात व्यक्तींनी त्याचे अपहरण केले. खेड भाळवणी येथे साळुंखे कुटुंबीयांची शेती आहे. रात्री शेतातील वस्तीवर अभ्यास करीत असताना प्रशांत हा शेतातील विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेला होता. त्या वेळी अज्ञात चारचाकी वाहनातून अज्ञात व्यक्ती शेतात आल्या. चोरटे असल्याच्या संशयावरून प्रशांत याने त्यांना रोखत, कोण आहे, अशी विचारणा केली. तेव्हा त्या आवाजाने त्या सर्वानी शेतातून पळ काढला. नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा रात्रीच्या सुमारास आलेल्या व्यक्तींनीच प्रशांत याचे अपहरण केल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.