लष्करी जीवनाचे आव्हान स्वीकारल्यानंतर देशाप्रती असलेली तुमची बांधीलकी हाच लष्करातील यशस्वी जीवनाचा मुख्य आणि महत्त्वाचा मार्ग असतो, असे प्रतिपादन मेजर जनरल आर. आर. निंभोरकर यांनी रविवारी ठाणे येथे केले. वेध व्यवसाय प्रबोधन परिषदेत डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या प्रश्नांना मेजर निभोंरकर यांनी खुल्या मनाने उत्तरे देऊन आपल्या लष्करी कारकिर्दीचा जीवनपट उलगडला. लष्करात भरती झाल्यानंतर आव्हान, नेतृत्व गुण, समूह संचार, बांधीलकीला खूप महत्त्व असते. हे सर्व साध्य करताना कुटुंबाचे पाठबळ पाठीशी असावे लागते. तरच या आव्हानात्मक जीवनात आपण खंबीरपणे वाटचाल करू शकतो. हा ताल आणि तोल सांभाळला तर सैन्यात अवघड असे काहीच नाही, असे निंभोरकर म्हणाले. दुर्गम खेडय़ात मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन साताऱ्याला इंग्रजी माध्यमातून सैनिकी शिक्षण पूर्ण केले. सैन्यात जायचेच ही एकच खूणगाठ मनाशी होती. कारगिल युद्ध, अमरनाथ यात्रा, दहशतवाद्यांना कंठस्नान घालणे या कसोटीच्या प्रसंगी मातृ, पितृ, गुरू ऋणाबरोबर आपण देशाचेही ऋण फेडत आहोत याची किंचित जाणीव सैनिकी सेवा करताना होते. गणवेशात तिरंग्याला सलाम करताना हुतात्म्यांचे होणारे स्मरण, प्रत्यक्ष सीमेवर सहकारी जवान जखमी असताना लहान, मोठा भेद न ठेवता त्या जवानाला अधिकारी म्हणून केलेले सहकार्य मानवी जीवनातील नवीन पैलू उलगडत असतात. याच जाणिवा जगण्यासाठी बळ देतात आणि पुढील पिढय़ा घडवत असतात. आपली मुलगी, जावई, बंधू सैन्यात सेवा देत असल्याचे मेजर निंभोरकर यांनी सांगितले.