१७ जून रोजी येथील नगराध्यक्षांची निवड होणार असून त्यासंदर्भातील कार्यक्रम जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी जाहीर केला आहे. नगराध्यक्षपद मिळविण्यसाठी इच्छुकांनी व्यूहरचना करण्यास सुरूवात केली असून नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठिंब्यानेच नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ते कोणामागे उभे राहतात याविषयी विविध तर्क करण्यात येत आहेत.
अडीच वर्षांपूर्वी पालिकेची निवडणूक झाली होती. त्यावेळी अधिकाधिक नगरसेवकांना अद्यक्षपदाची संधी मिळावी म्हणून भुजबळांनी दर दहा महिन्यांनी नवीन नगराध्यक्ष निवडण्याचे जाहीर केले होते. राजश्री पहिलवान यांना दहा महिन्यांसाठी संधी दिल्यांतर नीलेश पटेल हे नगराध्यक्षपदी विराजमान झाले. पटेल यांची सर्वाना सोबत घेऊन काम करण्याची पध्दत भुजबळांना अधिक रूचली. त्यामुळे २०१२ पासून आजपर्यंत पटेल यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु आता नवीन नगराध्यक्ष निवडीसाठी १७ जून रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलविण्यात आली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत १० जून असून त्याच दिवशी छाननी होऊन उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. १३ जून रोजी वैध उमेदवारी यादी तर १६ जून रोजी दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. लोकसभा निवडणुकीत येवला शहर व तालुक्यातून महायुतीचे उमेदवार खा. हरिश्चंद्र चव्हाण यांना मिळालेले ५३ हजारांचे मताधिक्य भुजबळांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. या पाश्र्वभूमीवर नगराध्यक्षाची निवड करताना भुजबळ कोणती खबरदारी घेतात यावर विरोधकांचीही नजर असणार आहे. नीलेश पटेल यांची कामगिरी चांगली असल्याने त्यांनाच पुन्हा संधी दिली जाते की, सरला निकम, प्रदीप सोनवणे, नीता परदेशी, संजय कासारे, जयश्री लोणारी, मुश्ताक शेख, रिजवान शेख, शबाना शेख यांच्या नावाची चर्चा राष्ट्रवादीकडून तर, भाजप-शिवसेनेतर्फे बंडू क्षीरसागर, सागर लोणारी, छाया क्षीरसागर हेही नगराध्यक्षपदासाठी उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत.