गांधी आणि नेहरू घराण्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढय़ाचा इतिहास बदलला. देशातील ५३० संस्थाने भारतात विलिनीकरण करताना तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंपेक्षा सरदार वल्लभभाई पटेल यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती, असे मत माजी केद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केले. गुजरात येथे होणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात मोठय़ा पुतळ्याच्या संकल्पनेला पूर्णत्व मिळावे म्हणून आयोजित एकता दौड कार्यक्रमानंतर ते बोलत होते.
 दिल्लीमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळाले नाही. त्यामुळे ‘आप’ ने सरकार स्थापन करावे, असेही ते म्हणाले. जनलोकपाल विधेयकाबाबत राज्यसभेतील सदस्यांच्या समितीने बनविलेल्या प्रस्तावास सर्वसहमती आहे. हे विधेयक सहमतीने मंजूर व्हायला हवे, असेही कार्यक्रमापूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. काँगेसच्या नेत्यांनी देशाचा इतिहास बदलवून टाकला. फक्त गांधी आणि नेहरू परिवारानेच स्वातंत्र्य युध्दात लक्षणीय कामगिरी केली, असे रंगविलेले चित्र चुकीचे असल्याचाही आरोप त्यांनी केला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या कामाची नोंद काँगेसच्या नेत्यांनी नीटपणे घेतली नाही. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेलांच्या कार्याचे मूल्यमापन लोकांना करून देता यावे, यासाठी सुरू केलेला हा उपक्रम स्त्युत्य असल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमासाठी हीच उपयुक्त वेळ असल्याचाही दावा त्यांनी केला.
 शहरातील पठण गेटजवळून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. शहरातील काही शाळेतील विद्यार्थी आणि भाजपचे कार्यकत्रे कार्यक्रमात सहभागी झाले. शहागंज येथील चौकात या रॅलीचा समारोप झाला. यावेळी माजी महापौर भागवत कराड, विजया रहाटकर, संजय केनेकर, नारायण कुचे, शिरीष बोराळकर आदींची उपस्थिती होती.