ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू तर एकजण जखमी झाला आहे. ठाणे येथील चरई भागात राहणारे नितीन खिस्ती (५६) हे सोमवारी सायंकाळी खोपट येथील सिग्नलजवळून मोटारसायकलने जात होते. त्यावेळी राज्य परिवहन सेवेच्या बसने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी बसचालक विनायक गणपत काळे (३५) याला अटक केली आहे. दिवा भागात राहणारे रवींद्र मुरकर हे सोमवारी रात्री आगासन भागातून पायी जात होते. त्यावेळी एका वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.तर लोकमान्यनगर येथे राहणारा प्रसाद जागुष्टे आणि किसननगर भागात राहणारा त्याचा मित्र संतोष सावंत हे दोघे मंगळवारी मोटारसायकलवरून भिवंडीकडे जात होते. त्यावेळी बाळकुम यशस्वीनगर येथील अग्निशमन कार्यालयासमोर एका डम्परची धडक त्यांच्या मोटारसायकलला बसली. त्यात डम्परच्या चाकाखाली सापडून प्रसादचा मृत्यू झाला व  संतोष गंभीर जखमी झाला. या प्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.