रस्त्यांची चाळण
* खड्डय़ांतून मार्ग काढण्यात  प्रशासनास अपयश
* कल्याण-डोंबिवलीतील   रस्त्यांची दुर्दशा
ठाण्यात पुढील तीन वर्षे तरी खड्डे पडणार नाहीत, अशा मोठय़ा घोषणा करत महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरातील रस्त्यांना डांबराचा मुलामा देण्यासाठी सुमारे २३० कोटी रुपयांचा खर्च करणारा ठाणे महापालिकेचा अभियंता विभाग आणि तेथील सत्ताधारी पक्षाचे नेते शहरातील प्रमुख नाक्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या टिकेचे धनी ठरले आहेत. ठाणे शहरासह कळवा, मुंब्रा, कोपरी, पाचपाखाडी, वागळे इस्टेट, वर्तकनगर, घोडबंदर अशा सर्वच परिसरांतील अंतर्गत रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून २३० कोटींचे रस्ते गेले तरी कुठे, असा सवाल आता ठाणेकर विचारू लागले आहेत. तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांना पुढे करून इतके दिवस ठाण्याचा ‘मेकओवर’ करण्याची भाषा करणारे अभियंता विभागातील वरिष्ठ अधिकारी या खड्डय़ांविषयी मूग गिळून बसले असून सर्वपक्षीय नगरसेवकांनीही मौन धारण केल्याचे चित्र दिसू लागले आहे.

ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागातील रस्त्यांवर खड्डे पडले असून त्यामध्ये महापालिकेने कोटय़वधी रुपये खर्च करून नव्याने तयार केलेल्या रस्त्यांचाही समावेश आहे. ठाणे शहर, घोडबंदर, कळवा-मुंब्रा आदी भागांतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. कोपरी वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, सावरकरनगर, इंदिरानगर, वर्तकनगर या परिसरांत खड्डय़ांमधून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. गेल्या आठवडय़ात लोकमान्यनगर बस डेपोजवळील रस्ता दोनदा खचला. कापुरबावडी, मानपाडा, पोखरण रोड, गोकुळनगर आदी भागातील रस्तेही खड्डेमय झाले आहेत. कापुरबावडी येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गावर यापूर्वी वाहतुकीची कोंडी होत होती. हा मार्ग एकेरी असल्याने त्या ठिकाणी कोंडीचा प्रकार घडत होता. त्यामुळे या भागात उड्डाणपूल तयार करून तो वाहनांसाठी खुला करण्यात आला. असे असताना या नव्या कोऱ्या पुलावरही भले-मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी कोटय़वधी रुपये खर्चून रस्त्यांना डांबरांचा मुलामा चढविला. काही ठिकाणी पूर्णपणे नवे रस्ते तयार करण्यात आले. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सुमारे २३० कोटी रुपयांची कामे काढण्यात आली. एवढय़ा मोठय़ा रकमेची कामे निघाल्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवक आनंदित झाले. खमके आयुक्त म्हणून प्रसिद्ध असलेले राजीव यांनी पुढील तीन वर्षे या रस्त्यांवर एकही खड्डा पडणार नाही, अशी घोषणाही करून टाकली. प्रत्यक्षात चित्र उलटे दिसत आहे. नितीन कंपनी आणि कॅडबरी भागातील रस्त्यांचाही या योजनेत समावेश होता. नव्याने तयार करण्यात आलेल्या या रस्त्यांवर खोदाई करण्यात येऊ नये, असा आदेशही राजीव यांनी काढला होता. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात या रस्त्यांवरही खड्डे पडल्याने रस्त्याच्या बांधकाम दर्जाविषयी आता प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. शहरातील जवळपास सर्वच प्रमुख नाक्यांवरील रस्ते शरपंजरी पडले असून ठाण्यातील एकाही राजकीय पक्षाकडून त्याविषयी साधा ‘ब्र’देखील उच्चारला जात नसल्याचे चित्र आहे.