हलकर्णी (ता.चंदगड) एमआयडीसीमध्ये होऊ घातलेल्या एव्हीएच केमिकल प्रकल्प आरोग्यास घातक असून तो बंद करावा, या मागणीकरिता सुमारे १ हजार मजरे कार्वे ग्रामस्थांनी गावापासून प्रकल्पस्थळापर्यंत मोर्चा काढला. चंदगड तालुका जनआंदोलन कृती समितीच्या एव्हीएच कंपनी विरोधातील धरणे आंदोलनाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवून आंदोलन केले. प्रकल्पस्थळी माजी आमदार नरसिंग पाटील, शिवाजी तुपारे, अॅड. संतोष मळवीकर, प्रा. एन. एस. पाटील, विष्णू गावडे यांनी प्रकल्प कसा घातक आहे याविषयी लोकांना मार्गदर्शन केले. आचारसंहिता असल्याने जमावबंदी पुढे करून शासनाने आम्हाला जसे अडविण्याचा प्रयत्न चालविला आहे त्याचप्रमाणे कंपनीचे काम बंद करा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. चंदगड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक असल्याने आचारसंहिता लागू आहे. या आचारसंहितेमुळे व जमावबंदी आदेश लागू असल्यामुळे ५ फेब्रुवारीपर्यंत आंदोलन स्थगित करून यानंतर मोठे जनआंदोलन उभारणार असल्याचे कृती समितीने सांगितले आहे. आंदोलनस्थळी आंदोलनाची पुढील दिशा ठरवताना प्रा. पाटील म्हणाले, या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. तालुक्यातील प्रत्येक वाडीवस्तीवर बैठका घेऊन एव्हीएच प्रकल्पाचा विरोधात जनजागृती करणार असल्याचे स्पष्ट केले. धरणे आंदोलनात ग्रा.पं. सदस्य रमेश परीट, यलुप्पा बोकडे, नारायण तेजम, माधुरी सुतार, गीतांजली तुपारे, उषा हारकारे, तानाजी गडकरी, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा.पी. ए. बोकडे यांनी आभार मानले.