गुरुवारी साजऱ्या झालेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘संस्कार भारती’च्या टिटवाळा, कल्याण, डोंबिवली, ठाणे, भांडुप, मुलुंड, दादर, गिरगाव, गोरेगाव, मालाड, कांदिवली-चारकोप, भाईंदर, वसई शाखांतर्फे प्रमुख रस्ते आणि चौकातून लहान-मोठय़ा रांगोळ्या काढण्यात आल्या त्यांची एकत्रित संख्या जवळपास सातशेहून अधिक आहे. डोंबिवली, ठाणे आणि बोरिवली येथे महारांगोळ्या रेखाटण्यात आल्या असल्याची माहिती ‘संस्कार भारती’च्या कोकण प्रांताचे एक प्रमुख कार्यकर्ते विनायक वाघ यांनी ‘वृत्तान्त’ला दिली. डोंबिवलीत श्रीगणेश मंदिर संस्थान, फडके रस्ता येथे ३ हजार चौरस फुटांची मोठी रांगोळी रेखाटण्यात आली. ‘भारतीय चित्रपटाची शंभर वर्षे’ असा विषय या रांगोळीचा आहे. त्यासाठी सुमारे ३०० किलो रंग आणि २०० किलो रांगोळी लागली, तर कोपर रस्ता येथे काढण्यात आलेल्या रांगोळीचा विषय ‘स्त्री-भ्रूण हत्या’ असा होता. ४० कार्यकर्त्यांनी पाच तासांत ही रांगोळी पूर्ण केली. येत्या रविवापर्यंत ही रांगोळी पाहता येईल. भांडुप येथील रांगोळीतून आम्ही ‘लेक वाचवा’ असा संदेश दिली तर ठाण्यातील रांगोळीतून ‘स्त्री शक्ती’ची वेगवेगळी रूपे दाखविण्याचा प्रयत्न केल्याचेही वाघ यांनी सांगितले. गोरेगावात संस्कार भारतीच्या महिला कार्यकर्त्यांनी स्वागतयात्रेच्या संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी रात्रभर जागून रांगोळ्या काढल्या. यंदा रत्नागिरी येथील लांजा येथेही ‘संस्कार भारती’तर्फे रांगोळी काढण्यात आल्याचे वाघ यांनी सांगितले. एक महारांगोळी काढण्यासाठी ४० ते ४५ कार्यकर्ते झटत असतात, असे ते म्हणाले.