* ज्येष्ठ अभिनेता-दिग्दर्शक अमोल पालेकर यांचे मत
* ‘वुई आर ऑन..’च्या निमित्ताने खास गप्पागोष्टी
कोणतेही काम करताना त्यात शिस्त असली, तर ते काम नक्कीच जास्त चांगले होते. मराठी चित्रपटसृष्टीतही अधिकाधिक चांगले काम होण्यासाठी शिस्तीची गरज आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेता व दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केले. ‘वुई आर ऑन, होऊन जाऊ दे’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने ‘रविवार वृत्तान्त’शी त्यांनी खास गप्पागोष्टी केल्या. बासू चटर्जी किंवा हृषीकेश मुखर्जी यांच्या सेटवरही शिस्तीचे वातावरण असे. दक्षिणेत आजही अत्यंत शिस्तबद्ध काम चालते. या सगळ्यातून आपणही काही शिकले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. ‘वुई आर ऑन..’चे चित्रीकरणही अशाच शिस्तबद्ध मात्र अत्यंत हलक्याफुलक्या वातावरणात झाल्याचे त्यांनी सांगितले. हा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.
हलक्याफुलक्या आणि विनोदी चित्रपटांमध्ये काम केलेल्या अमोल पालेकर यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच विनोदी चित्रपट आहे. त्याबाबत त्यांना विचारले असता, आपला पिंड बासूदा, राजा परांजपे, हृषीदा यांच्या चित्रपटांवर पोसला आहे. त्यामुळे त्या पठडीतील विनोदी चित्रपट बनवण्याचा आपला विचार होता, असे त्यांनी स्पष्ट केले. या चित्रपटाची कथा आपल्या मनात चार-पाच वर्षे घोळत होती. मात्र चांगल्या प्रकारे ही कथा कागदावर उतरवणारे लेखक मिळत नव्हते. अखेर संध्याने ही जबाबदारी पार पाडली, असे त्यांनी सांगितले.
आम्ही पहिल्या चित्रपटापासूनच सगळी पूर्वतयारी करून पूर्ण नियोजनानिशी चित्रीकरणाला सुरुवात करतो. मराठीत ही पद्धत अजून कोणाच्याही अंगी रुळलेली नाही. त्यामुळे पहिले दोन दिवस सगळ्याच कलाकारांना या शिस्तबद्ध वातावरणाशी जुळवून घेताना त्रास झाला. मात्र त्यानंतर सर्वानीच ही शिस्त स्वीकारली. विशेष म्हणजे त्यामुळे आमचे काम लवकर झाले, असेही त्यांनी सांगितले. मराठी चित्रपटसृष्टीत या शिस्तीचा अभाव आहे. ही शिस्त आपल्या लोकांनी अंगी बाणवली, तर अधिक चांगले काम करता येईल, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.
आपल्या विधानाला पुष्टी देताना त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे उदाहरण दिले. सकाळी सात वाजता कॉल टाइम असेल, तर रजनीकांत यांच्यासारखा सुपरस्टारही पावणेसात वाजता मेकअप करून सेटवर इतरांबरोबर चहा पीत तयार असतो. रजनीकांत यांच्यासारखा कलाकार ही शिस्त पाळत असेल, तर आपल्याला ती पाळण्यास काहीच हरकत नाही, असेही ते म्हणाले.