गतवर्षीच्या कटू अनुभवामुळे यंत्रमागधारकांचे आर्थिक कंबरडे मोडले होते. दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षांकडे तो मोठय़ा आशेने पाहत असताना इथेही प्रथमग्रासे मक्षिकापात अशी अवस्था झाल्याने त्यांच्यातील अस्वस्थता वाढीस लागली आहे.
कामगारांचा प्रदीर्घकाळचा संप, मजुरीत झालेली लक्षणीय वाढ, वीज दरवाढ, मंदी या संकटांमुळे गेले आर्थिक वर्ष यंत्रमागधारकांना अभुतपूर्व त्रासदायक गेले. यंदा दिवाळीनंतर पाच दिवस यंत्रमाग वीज दरवाढीमुळे बंद राहिले. दीपावली पाडव्याचे सौदे यथातथा झाल्याने आणि कापडाला मागणी नसल्याने नव्या वर्षांबद्दल यंत्रमागधारकांना चिंता वाटू लागली आहे. तर कामगार संघटनांनी महागाई निर्देशांकाप्रमाणे मजुरी वाढ होण्यासाठी जानेवारी महिन्यात आंदोलनाला हात घालण्याच्या हालचाली सुरू केल्याने हे आव्हान कसे पार पाडायचे याची धास्तीही जाणवत आहे.
यंत्रमाग क्षेत्रामध्ये दोन प्रकारचे आर्थिक वर्ष असते. बँकांच्या हिशोबाप्रमाणे एप्रिल ते मार्च असा आर्थिक व्यवहार केला जातो. तर दुसरीकडे दीपावली पाडवा ते दीपावली असे दुसऱ्या आर्थिक वर्षांची चोपडय़ांमध्ये बंदीस्त झालेले असते. यंदाच्या दीपावली पाडव्याचे चोपडी पुजन करताना यंत्रमागधारक, कापड व्यापारी, सूत व्यापारी या साऱ्या घटकांनी आगामी वर्षतरी सुखकारक जाऊ दे अशी मनोमन प्रार्थना केली. गतवर्षांतील कटू अनुभवांचे स्मरण करीत यापुढे अशी आपत्ती येऊ नये, असा धावा केला जात होता. मागील वर्षांमध्ये वस्त्रोद्योगामध्ये संकटाची मालिकाच सुरू होती. कामगारांचा मजुरीवाढीचा प्रदीर्घ लढा हा लक्षवेधी ठरला होता. तब्बल ४० दिवस कामगारांनी कामबंदचा यल्गार पुकारला होता. अखेर त्यांना तब्बल ४८ टक्के इतकी मजुरीवाढ दिल्यानंतर आंदोलनावर पडदा पडला. या आंदोलनामुळे यंत्रमागधारकांसह एकूण उद्योग विचलित झाला. अशातच मंदीमुळे कापडाला मागणी नसल्याने आर्थिक गणिते चुकत गेली. वीज दरवाढीची झळ बसल्याने जीर्ण झोळी आणखीनच फाटकी बनली. या समस्यांमुळे यंत्रमागधारक हाबकून गेला होता.     
दिवाळीनंतरच्या नव्या वर्षांकडे आता तो मोठय़ा अपेक्षने पाहत आहे. यंदा तरी सारे काही ठिकठाक व्हावे, अशी अपेक्षा तो बाळगून आहे. पण ठरविल्याप्रमाणे सर्व काही पार पडतेच याची खात्री नसते. त्याची खातरजमाच दीपावली पाडव्याच्या दिवशी आली. मुहुर्ताने होणारे सौदे निराशाजनक ठरले. प्रतिवर्षीच्या तुलनेत निम्म्या प्रमाणातही सौदे झाले नसल्याचे मत राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. मंदीचे वातावरण कायम असल्याने सूत व कापड या दोन्ही घटकांची मागणी थंडावली आहे. परिणामी यंत्रमागधारक कारखाने सुरू करण्याच्या घाईमध्ये नाही. शिवाय वीज दरवाढीच्या विरोधात पाच दिवस कारखाने बंद राहिल्याने घडी बसण्यास वेळ लागणार आहे. याच प्रश्नासाठी आगामी काळात आणखी किती दिवस बंद ठेवावा लागणार याची बोच यंत्रमागधारकांना लागलेली आहे. दिवाळीच्या बोनसबाबत रास्त तडजोड न झाल्याने अद्यापही काही सायझिंगमध्ये कामगार कामावर जाण्यास तयार नाहीत. सायझिंग सुरू झाल्या नाहीत तर त्याचा विपरित परिणाम कसा होणार याची चर्चाही सुरू झाली आहे.
कामगार आंदोलनाच्या हालचाली
कामगारांच्या मजुरीवाढीच्या आंदोलनावेळी महागाई भत्त्याप्रमाणे वर्षांतून दोनदा पगारवाढ करण्याचा मुद्दा करारामध्ये समाविष्ट केला होता. डिसेंबर अखेर पहिला टप्पा पार पडणार आहे. महागाई निर्देशांकात किती वाढ झाली आहे याचा अंदाज जानेवारी महिन्यामध्ये घेतला जाणार असून त्यानंतर कामगारांना निर्देशांक वाढीनुसार मजुरी मिळावी यासाठी लढा द्यावा लागणार असल्याचे मत माकपचे कामगार नेते कॉ.दत्ता माने यांनी व्यक्त केले.