उपराजधानीत अपघाताचे सत्र सुरूच असून भाऊबीजेच्या दिवशी दोन कुटुंबावर काळाने झडप घातली. शहरातील विविध भागात झालेल्या अपघातात एका भावाचा आणि एका बहिणीचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले.
सीताबर्डीवरील उ्डाणपुलावर बुधवारी रात्री एका भरधाव वेगात येणाऱ्या कारने एका मोटारसायकला जबर धडक दिल्याने त्यात भावाला बहिणीचा मृत्यू ‘याचि डोळा’ पाहावा लागला. भालगावमधील म्हाडा कॉलनीत राहणारा कनिष्क ओमप्रकाश नंदेश्वर (२४) आयआयसीआय बँकेत काम करतो. त्याचे काका बेसा येथे राहतात. दिवाळीनिमित्त चुलत भाऊ नागपूरला आल्याने कनिष्क आणि त्यांची बहीण प्रियंका आणि भाची नियासी मोटारसायकलने बेसाला जात असताना वर्धा मार्गावरून भरधाव वेगात येणाऱ्या स्कॉर्पिओने मोटारसायकलला जबर धडक दिली. याच हे तिघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नागरिकांनी त्यांना  सीताबर्डी येथील खाजगी रुग्णालयात नेत असताना प्रियंकाचा वाटेतच मृत्यू झाला. कनिष्क आणि नियासी यांच्यावर उपचार सुरू आहे. प्रियंका ही रामटेकमध्ये किट्स कॉलेजमध्ये प्रथम वर्षांला होती. दरम्यान घटनेची माहिती त्यांच्या घरी कळविण्यात आल्यानंतर घटनास्थळी सर्वानी धाव घेतली. बेसाला राहणारा चुलत भाऊ आणि त्याचे कुटुंबीयांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला बहिणीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दुसरी घटना दुपारी गिट्टीखदानमधील काटोल मार्गावरील दाना कॉलनीत घडली. विलास पांडुरंग देशमुख (६३) बीएसएनएलचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. आज दुपारी ते हनुमाननगरमध्ये राहणाऱ्या बहिणीकडे मुलगा प्रसादला घेऊन स्कूटरने निघाले. काटोल मार्गावर वळण घेत असताना काटोलकडून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने त्यात विलास देशमुख यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने जागीच ठार झाले. मुलगा प्रसाद या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याला जवळच्या एखा खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला. नागरिकांनी पाठलाग करून ट्रक चालक धर्मेद्र गौर याला पकडले आणि चांगलाच चोप दिल्याने काही काळ त्या भागात तणाव निर्माण झाला होता.  पोलिसांनी ट्रक चालक गौर याला
अटक केली आहे.