नाटक/थिएटर म्हणजे काय आहे ते मला माहिती नाही. नाटक म्हणजे विविध अनुभवांच्या प्रक्रियेची प्रयोगशाळा आहे आणि तो अनुभव घेण्यासाठी मी नाटक करतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शक रतन थिय्याम यांनी मंगळवारी मुंबईत केले. मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टतर्फे विद्यापीठाच्या कालिना येथील संकुलातील मोदी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसांच्या राष्ट्रीय महारंग परिषदेत ते बोलत होते. या वेळी थिय्याम यांचे मुख्य भाषण झाले.विद्यापीठाच्या थिएटर आर्ट्सचे संचालक शफाअत खान, रुद्रप्रसादसेन दासगुप्ता या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. २७ मार्चपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत १९९० नंतरचे भारतीय नाटक, भारतीय नाटकांसमोरील आव्हाने आणि मर्यादा, नाटकातील नवे प्रयोग आणि अन्य संबंधित विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत.भारताला नाटकाच्या इतिहासाची गौरवशाली परंपरा असून आत्ताच्या परिस्थितीत या परंपरेचे भान राखून त्यात नवीन प्रयोग काय करता येतील, त्याचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचेही थिय्याम म्हणाले. आपल्या बीजभाषणात थिय्याम यांनी जागतिकीकरण आणि भारतीय नाटक, नाटक माध्यमाचा समाजावर होणारा परिणाम, नाटकाची सामाजिक जबाबदारी आदी मुद्दय़ांचेही विवेचन केले. शफाअत खान यांनी चार दिवसांच्या या परिषदेत होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.