महापालिकेच्या मांडा-टिटवाळा विभागातील अनधिकृत बांधकामे तोडण्याची कारवाई मंगळवारपासून प्रशासनाने सुरू केली आहे. ज्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या काळात सर्वाधिक अनधिकृत बांधकामे झाली त्यांनाच ही बांधकामे तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, नव्याने उभ्या राहणाऱ्या बेकायदा बांधकामांकडे ही करवाई करताना दुर्लक्ष होत असल्याचे चित्र असून ही कारवाई म्हणजे नाटक असल्याची चर्चा नव्याने रंगली आहे.
आयुक्त शंकर भिसे यांच्या आदेशावरून अनधिकृत बांधकामे पाडकाम मोहीम सुरू झाली आहे. टिटवाळा, कल्याण पूर्व, डोंबिवलीत आयरे-कोपर पूर्व भाग आणि डोंबिवली पश्चिमेतील बेकायदा बांधकामे विशेष मोहिमेअंतर्गत जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. नियंत्रण अधिकारी उपायुक्त संजय घरत, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त सुरेश पवार, पथक प्रमुख लहू वाघमारे, रवींद्र गायकवाड आणि मधुकर शिंदे, स्थानिक अधिकारी चंदुलाल पारचे या प्रभाग अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. ‘अ’ प्रभागात काही प्रभाग अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे अनधिकृत बांधकामे उभी राहिल्याच्या महापालिकेत तक्रारी आहेत.
या पथकातील रवींद्र गायकवाड हे टिटवाळ्यात प्रभाग अधिकारी होते. त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. त्यामुळे ही बांधकामे तोडण्याची जबाबदारी पुन्हा याच अधिकाऱ्यांवर सोपवून आयुक्तांनी काय साधले, अशी चर्चा रंगली आहे.