प्रवेश परीक्षेला ‘डमी’ बसवून गैरमार्गाने वांद्रे येथील ‘एन. एम. इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’ (एनएमआयएमएस) या संस्थेची एमबीए ही व्यवस्थापन अभ्यासक्रमविषयक पदवी हस्तगत करणाऱ्या २२ उमेदवारांना लवकरच आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागणार आहे. संस्थेतून २०१२ मध्ये उत्तीर्ण झालेले हे २२ उमेदवार विविध कंपन्यांमध्ये स्थिरस्थावर झाले आहेत. या कंपन्यांना पत्र पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना संस्थेने केली आहे.
या संस्थेच्या ‘एनमॅट’ या ऑनलाईन माध्यमातून होणाऱ्या सीईटीला डमी उमेदवार बसवून प्रवेश देणारे रॅकेट पोलिसांच्या गुन्हे शाखेने संस्थेच्या मदतीने उघडकीस आणले. या रॅकेटच्या माध्यमातून या वर्षी तब्बल ६१ उमेदवार प्रवेश मिळविण्यात यशस्वी झाले होते. पण, मुलाखतीच्या टप्प्यावर या उमेदवारांचे पितळ उघडे पडल्याने संस्थेला संशय आला. त्यांनी ऑनलाईन प्रवेश देताना काढण्यात आलेल्या छायाचित्रांशी या उमेदवारांचे छायाचित्रे पडताळून पाहिली असता ती जुळत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण मुळापासून खणून काढल्यानंतर डमी बसवून प्रवेश मिळवून देणारे हे रॅकेट उघडकीस आले.

परीक्षेचे स्वरूप ऑनलाईन केल्यानंतर म्हणजे २०११पासूनच या रॅकेटच्या माध्यमातून उमेदवार संस्थेत प्रवेश घेत आहेत. २०११ला संस्थेत दाखल झालेल्या या उमेदवारांनी संस्थेची पदवीही हस्तगत केली आहे. या सर्व उमेदवारांचा शोध आम्ही घेत असून २०११मध्ये प्रवेश घेतलेल्या व एमबीएची पदवी मिळवून नोकरीत स्थिरस्थावर झालेल्या २२ उमेदवारांची यादीच तयार केली आहे. संस्थेने ही यादी पोलिसांकडे सुपूर्द केली आहे. पण, आपण इतकेच करून थांबणार नाही. तर या उमेदवारांवर कायदेशीर कारवाईही करणार आहोत, असे संस्थेचे संचालक राजन सक्सेना यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले.
संस्थेने या उमेदवारांची एमबीएची पदवी, निकाल आदी सर्व रद्द केले आहेत. शिवाय कॅम्पस प्लेसमेंटमधून या बोगस उमेदवारांना ज्या ज्या ठिकाणी नोकरी मिळाली आहे त्या त्या कंपन्यांशी संपर्क साधून त्यांच्या कारनाम्यांची माहिती दिली आहे. या रॅकेटच्या माध्यमातून २०१२मध्येही काही तरुण संस्थेत दाखल होण्यात यशस्वी झाले आहेत. हे तरुण आता एमबीएच्या दुसऱ्या वर्षांला आहेत. त्यांनाही शोधण्याचे काम सुरू आहे, असे सक्सेना यांनी स्पष्ट केले. ६०० विद्यार्थ्यांमधून हे बोगस तरुण शोधण्याचे काम संस्थेला करावे लागणार आहे.