एकता कपूरची निर्मिती असलेल्या मालिकेने अडीचशे भाग पूर्ण करणे म्हणजे तशी फार मोठी गोष्ट नाही. ज्या बालाजी प्रॉडक्शनने प्रेक्षकांना महाएपिसोड आणि दीर्घकाळ चालणाऱ्या मालिकांची सवय लावली त्यांच्यासाठी २५० भाग म्हणजे किस झाड की पत्ती. पण काळ बदलत चाललाय तशी वाहिन्यांमधील स्पर्धाही वाढत चालली आहे. दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या मालिका प्रेक्षकांना हल्ली फारशा आवडत नाहीत. किंबहुना त्यांना दीर्घकाळ आपल्यासोबत नेतील अशा आशयाच्या मालिका, तेवढे ताकदीचे कलाकारही मिळत नाहीत. आणि म्हणूनच ‘क्या हुआ तेरा वादा’ या मालिकेचे २५० भाग पूर्ण झाले म्हणून बालाजी प्रॉडक्शन आनंद साजरा करीत आहे.
‘जस्सी’फेम मोना सिंग मध्यवर्ती घेऊन या मालिकेची कथा रचण्यात आलीय. विवाहबाह्य़ संबंध, मग सवतीसुभा, नवऱ्याला मिळविण्यासाठी पहिल्या बायकोची धडपड आणि तो पहिलीकडे जाऊ नये म्हणून त्याला धरून ठेवण्याची दुसरीची धडपड, यात मुलांची होणारी ससेहोलपट असा या मालिकेचा प्रवास आहे. त्यात पहिल्यांदाच आपल्या सुनेच्या पाठी भक्कमपणे उभे राहणारे सासू-सासरे दाखवून एकताने आपल्या प्रेक्षकांना काहीसा सुखद धक्काच दिला होता. मुलाची चूक झाली म्हणून त्याला घराबाहेर काढून सूनेला घरात स्थान देणारे, तिच्या दुसऱ्या विवाहासाठी झटणारे, प्रसंगी आपल्या नातवांना आईची परिस्थिती समजावून देण्यासाठी झगडणारे आजी-आजोबा इथपर्यंत कथेचा प्रवास सुरळीत सुरू होता. मोना भाभीनेही प्रेक्षकांची मने जिंकलीत. पण मोना भाभीचे दुसरे लग्न होता होईना. त्यात दुसरा, तिसरा असे एकताचे आवडीचे नायक घेऊन झाले. पण कथा काही या सवतीच्या कटकरस्थानांपुढे जात नव्हती. मग अचानक या मालिकेने दहा वर्षांची उडी घेतली. मोना भाभीची मुले मोठी झाली. ज्या नवऱ्यावरून वाद उभा राहिला तो मालिकेतून गायब झाला. पण सवत अनुष्का सरकार मात्र कायम राहिली आहे.
अशा परिस्थितीत क्या हुआ तेरा वादा या मालिकेचा टिकाव लागणे अशक्य होते. त्यामुळे उडी घेऊन का होईना मालिकेने २५० भाग तर पूर्ण केले. आता मालिका चांगली चालावी म्हणून मोना भाभीसाठी एकताने आपला आवडता हीरो हितेन तेजवानी याची पुन्ही वर्णी लावली आहे. पण मालिकेचे भरकटलेले तारू मोना भाभीच्या की सवत अनुष्का सरकारच्या किनाऱ्याला लागणार याबाबतीत निर्माता-दिग्दर्शकाचा वैचारिक गोंधळ सुरूच आहे. अडीचशे भाग पूर्ण झाले म्हणून आनंदोत्सव सुरू असताना दुसरीकडे मालिका लवकरच बंद होणार असल्याच्या वावडय़ा उठल्या आहेत. त्यात मोना सिंगही एमएमएस प्रकरणात अडकली होती. पण सहजासहजी प्रेक्षकांना सोडेल तर ती एकता कपूर कसली? त्यामुळे ‘अगं बाई तू काय दाखवायचा आम्हाला वादा केला होतास’असे एकतालाच विचारायची वेळ प्रेक्षकांवर आली आहे.